
घटनेबाबत मृत बाळाचे वडील आशिष पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. बाळाला ताप आल्याने त्याला वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान बाळाच्या शरीरात पाणी झाल्याचे सांगत डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. त्यानुसार शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यानंतर बाळाला लावलेल्या मशीनमध्ये स्पार्क झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याबाबत विचारणा केल्यावर मशीन व्यवस्थित सुरू असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, बाळाच्या ऑक्सिजन सिलेंडरबाबत तक्रार केल्यावर वडिलांना वॉर्डबाहेर काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुढे बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सेकंड ओपिनियनसाठी वैद्यकीय अहवाल मागितले असता ते देण्यास टाळाटाळ करण्यात आली, तसंच बाहेर सल्ला घेतल्यास जबाबदारी संपेल असं सांगण्यात आलं असं स्पष्टीकरण पालकांनी दिलं आहे. दरम्यान, मनसेचे कार्यकर्ते विशाल सावंत यांनी ही घटना समोर आणली असून, बाळाच्या अंत्यविधीनंतर अधिकृत तक्रार करणार असल्याचे पालक आशिष पाटील यांनी सांगितले आहे.
बाळाच्या मृत्यू प्रकरणी वाडिया रुग्णालयाने आरोप फेटाळले
वाडिया रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले असून रुग्णालयाच्या अधिकृत प्रवक्त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, या प्रकरणाबाबत रुग्णालयाकडे कोणतीही औपचारिक तक्रार प्राप्त झालेली नाही. सोशल मीडियावर फिरणारे आरोप अप्रमाणित, दिशाभूल करणारे असून संस्थेची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने पसरवले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.’आमचे रुग्णालय हे विशेषीकृत बालरुग्णालय असून, गंभीर अवस्थेतील नवजात व बालरुग्णांवर उपचार करण्याचा मोठा अनुभव आहे. आमची वैद्यकीय टीम सर्व उपचार प्रक्रियेत प्रस्थापित वैद्यकीय प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करते आणि रुग्णसेवेचे उच्चतम मानदंड जपते,’ असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच, अप्रमाणित व चुकीची माहिती पसरवण्याचा निषेध करण्यात येत असल्याचेही रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.