
'सॉरी मम्मी-पप्पा, पुन्हा परीक्षेची हिंमत नाही'; आणखी एका NEET विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
मऊगंज : मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातील मगनिया गावातील रहिवासी आकांक्षा चतुर्वेदी हिने तिच्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, आकांक्षाला नुकत्याच झालेल्या परीक्षेत ६५० गुण मिळविण्याची आशा होती, परंतु पेपरफुटी आणि परीक्षा रद्द झाल्यानंतर ती नैराश्येत गेली आणि तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली, ज्यात तिने लिहिले होते की, माफ करा, आई-बाबा, तुम्हाला विश्वास होता की, माझी मुलगी शिक्षण घेऊन डॉक्टर होईल, पण माझ्यात पुन्हा नीट परीक्षा देण्याचे धाडस नाही. दरम्यान, आकांक्षाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही तिचे वडील कृष्ण कुमार चतुर्वेदी यांनी ३ लाख रुपयांचे क्रेडिट कार्ड कर्ज घेतले आहे. ते एक शेतकरी होते, पण आपल्या मुलीला शिक्षण देण्यासाठी त्यांनी नागपूरमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि तिथेच तिचे शिक्षण सुरू ठेवले.
दरम्यान, जेव्हा नीट परीक्षा झाली, तेव्हा संपूर्ण कुटुंबाला खात्री होती की, तिची निवड होईल आणि ती डॉक्टर बनेल. पण, तरुणीने आत्महत्या केल्याने सर्वच चित्र बदललं आहे.
परीक्षा पुन्हा घ्याल; पण माझ्या मुलीला परत आणू शकाल का?
आकांक्षाची आई नीलम, रडत म्हणाल्या की, या भ्रष्ट व्यवस्थेने माझ्या मुलीचा जीव घेतला आहे. पेपर फुटला नसता, तर माझी मुलगी आज जिवंत असती. परीक्षा पुन्हा घ्याल, पण माझ्या मुलीला परत जिवंत करू शकाल का?
तरुण पिढी चुकवतेय किंमत
मोदीजी, पदे कायम नसतात; ती येतात आणि जातात. पण तुम्ही १२ वर्षांत शिक्षण व्यवस्था ज्या थराला नेली आहे, त्याची किंमत भारताची संपूर्ण तरुण पिढी चुकवत आहे.
– राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा