
बुधवार पेठ बनली ‘मिनी बांगलादेश’! अकरा महिन्यात तब्बल 103 बांगलादेशींना पकडले
पुणे/अक्षय फाटक : पुण्याच्या बुधवार पेठेने आता भारतातील ‘बांगलादेश’ अशी ओळख निर्माण केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दर महिन्याला पोलिसांकडून छापा कारवाई करून बांगलादेशी महिला, मुले आणि धक्कादायक म्हणजे, अल्पवयीन मुलांना पकडले जात आहे. त्यांना याठिकाणी बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड काढून सुव्यवस्थितरित्या इथे पोहचवले जात आहे. विशेष म्हणजे पुण्याचा सुमित चव्हाण याचा मास्टर माईंड असल्याचेही समोर आले आहे. या महिलांना आसाम, पश्चिम बंगाल व झारखंड तसेच उत्तरप्रदेश येथून कागदपत्रे तयारकरून दिली जात असल्याचेही पोलिसांच्या चौकशीतून समोर आलेले आहे. या माहितीनंतर आता पोलिसांकडून एजंट, म्होरके आणि येथील साखळी मोडीत काढण्यासाठी व्यापक पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे. २८ एप्रिलपर्यंत बुधवार पेठेतून ३६ बांगलादेशी महिलांना पकडण्यात आले आहे. गेल्या अकरा महिन्यात १०३ बांगलादेशींना पकडण्यात आले आहे.
बांगलादेशी मोहिमेत सर्वाधिक कारवाया बुधवार पेठेत होत असल्याचे समोर आले आहे. सातत्याने येथून बांगलादेशी महिलांना पकडण्यात येत आहे. या महिलांना एजंट भारतात आणल्यानंतर बेंगलोर, मुंबई याठिकाणी ठेवून तेथून पु्ण्यात आणत असल्याचे दिसून आले आहे. देशात बेकायदा प्रवेश करून पुण्यापर्यंत पोहचवल्या जात आहेत. त्यांना भारतीय आधार कार्ड आणि पॅन कार्ड देखील काढून दिले जात असल्याचे वारंवार केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. या महिला बुधवार पेठेतील कुंठण- खान्यात ठेवून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात आहे. पुणे पोलिसांनी गेल्या दोन वर्षापासून या बांगलादेशीविरोधात जोरदार मोहिम राबवली आहे. त्यांना पकडून त्यांच्यावर गुन्हे नोंदवत त्यांची मायदेशी पाठवणी केली जात आहे.
गेल्या वर्षी ८१ बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठविले आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या सूचनेनुसार येथे अचानक कारवाई सुरू आहे. अवैध स्थलांतरितांविरोधात कारवाई सातत्याने वाढत असून, बांगलादेशीसोंबतच इतर शहरातील नागरिक देखील बेकायदा पुण्यात वास्तव्य करत असल्याचे दिसून आलेले आहे. पोलिसांनी शहरातील विविध भागात तपास मोहीम, कागदपत्र पडताळणी व गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त कारवाई केली असून मानवी तस्करी आणि देहविक्रीसारख्या गुन्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
अवैध स्थलांतरितांविरोधात कारवाई व परत पाठवलेली संख्या
२०२३ – १८
२०२४- ५७
२०२५- १०४
२०२३ मध्ये निर्वासितांमध्ये बांगलादेशी नागरिकांची संख्या शून्य होती, तर आफ्रिकन देशांतील २ आणि इतर देशांतील १६ नागरिकांचा समावेश होता. २०२४ मध्ये ही संख्या वाढून एक बांगलादेशी, २५ आफ्रिकन देशांतील नागरिक आणि ३१ इतर देशांतील नागरिकांना निर्वासित केले आहे.
२०२५ मध्ये मात्र बांगलादेशी नागरिकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढून ८१ झाली, तर आफ्रिकन देशांतील ३ आणि इतर देशांतील २० नागरिकांना निर्वासित करण्यात आले. एकूण १०४ जणांवर कारवाई करण्यात आली.
बनावट कागदपत्रे अन् आश्रय
बांगलादेशी नागरिकांना पुण्यात वास्तव्य करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, यासाठी ते बनावट कागदपत्रे बनवत असल्याचे आढळून आले आहे. आंबेगाव पोलिसांनी एका कारवाईदरम्यान भारतीय रहिवाशी कागदपत्रांसोबतच बांगलादेशाचे कागदपत्रे पकडले होते. या महिलेने भारतीय व्यक्तीसोबत विवाह केला होता. या विवाहानंतर ती दोन वेळा बांगलादेशात देखील जाऊन आल्याचे समोर आले होते.
मोबाईल ॲपद्वारे संपर्क
बांगलादेशी नागरिक त्यांच्या मोबाईलमध्ये एक विशिष्ट ॲप डाउनलोड करून त्यामाध्यमातून बांगलादेशातील नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांशी संपर्क ठेवत होते. पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नागरिकांच्या मोबाईलची तपासणी केली जाणार असून, त्यातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा : CET निकालानंतर मानसिक तणाव, विद्यार्थिनीने राहत्या घरी संपवलं जीवन; पुण्यातील घटना
बांगलादेशींवरील कारवाई दृष्टीक्षेपात
| वर्ष | शहर व बुधवार पेठ | परत पाठवलेले |
|---|---|---|
| २०२१ | २ | ०० |
| २०२२ | ०० | ०० |
| २०२३ | ११ | ०७ (शहरातून ५१ जणांना पकडले) |
| २०२४ | ०६ | ०३ |
| २०२५ | ०८ | १६ (शहरातून पकडले १५) |
| एप्रिल २०२६ | ०५ | ३६ |