संग्रहित फोटो
नगरपालिकेच्या नियमानुसार स्टॉक रजिस्टर लिहिण्याचे काम जोडारी यांच्याकडे असले, तरी रजिस्टर सुरक्षित ठेवण्याची मुख्य जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांची असल्याचा दावा नगरसेविकांनी केला आहे. त्यामुळे रजिस्टर गहाळ झाल्याची फिर्याद पाणीपुरवठा विभागप्रमुखांनीच दाखल करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तक्रारदार अधिकारी संजय पोईपकर यांनी समितीच्या सभेत ऑडिटसाठी पुरवठादाराकडून दीड लाख रुपये घेतल्याची कबुली दिल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित पुरवठादारानेही पैसे दिल्याचे मान्य केल्याचे नगरसेविकांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्वतःवर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तीनेच आरोपीविरोधात पोलिसांत फिर्याद कशी दाखल केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणात केवळ जोडारी यांच्यावर कारवाई करून प्रकरण संपवू नये. मुख्याधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांचीही भूमिका तपासणे आवश्यक असल्याचे ॲड. सायली दुभाषी आणि शर्वरी धारगळकर यांनी म्हटले आहे. रजिस्टर गहाळ होण्यामागे नेमकी कोणाची जबाबदारी आहे, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकारामुळे सावंतवाडी नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचे नगरसेविकांनी म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने विशेष तपास पथक स्थापन करून मुख्याधिकारी, तक्रारदार अधिकारी तसेच या प्रकरणाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या संबंधित असलेल्या व्यक्तींची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.






