
आंदेकर टोळीकडून वनराजच्या खुनातील आरोपींचे नातेवाईक टार्गेट; पोलीस यंत्रणेपुढे मोठे आव्हान
पुणे : वनराज आंदेकर खूनानंतर वर्षपुर्तीच्यावेळीच आंदेकर टोळीकडून बदल्याच्या भावनेतून यातील सर्व आरोपींच्या नातेवाईकांना टार्गेट करण्यात आल्याचे समोर आलेले असताना या खूनांचे नियोजनही ‘त्या’ वर्षातच झाल्याचे वास्तव आता समोर येऊ लागले आहे. कारण, आयुष कोमकरच्या खूनापुर्वीच आंदेकर टोळीचा सदस्य आवेज खान हा पुणे पोलिसांच्या रडारवरून लपण्यासाठी उत्तरप्रदेशात जाऊन लपल्याचे समोर आले आहे. अक्षय म्हस्केच्या खूनासाठी तो तीन दिवसांपुर्वीच पुण्यात आला होता, असेही समोर आले आहे.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा १ सप्टेंबर २०२४ रोजी सोमनाथ गायकवाड याच्या टोळीकडून खून झाला. या खूनाने शहर तर हादरले होतेच पण आंदेकर टोळी पुर्ण हादरून गेली होती. पण, आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरला हा खून जिव्हारी लागला होता. तेव्हाच आंदेकर टोळीकडून मुलाच्या बदल्यात आरोपींचे नातेवाईक टार्गेट करण्यात आले असल्याचे सांगितले जात होते.
पहिला खून सोमनाथ गायकवाड याच्या कुटूंबाचा होता, पण तो प्लॅन पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. नंतर मात्र, ऐन गणेशोत्सवाच्या काळात बंडू आंदेकरच्या मुलीचा मुलगा आयुष कोमकरचा तब्बल ९ गोळ्या झाडून खून केला. नंतर दुसरा खून वनराजच्या खूनातील आरोपी समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याचा खडी मशीन चौकात गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून करण्यात आला. त्यानंतर आता तिसऱ्या खूनाचा प्रयत्न झाला. सतत होणाऱ्या या घटनामुळे मात्र, पुण्यात मोठ्या दहशतीचे वातावरण पसरलेले आहे.
आयुष कोमकर खूनप्रकरणानंतर पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी उत्तर प्रदेशात लपून बसलेला आवेज खान अलीकडेच पुण्यात परतला. नंतर लगेचच त्याने तीन दिवस रेखी करून वनराज खून प्रकरणातील आरोपीचा भाऊ अक्षय म्हस्केवर गोळीबार व कोयत्याने हल्ला केला. त्यामुळे तो पोलिसांच्या रडारवरून लपण्यासाठीच उत्तरप्रदेशात गेला असल्याचेही आता निष्पन्न झाले आहे.
आयुष कोमकरच्या खुनानंतर पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीशी संबंधित सक्रिय गुन्हेगार व त्यांच्या साथीदारांविरोधात मोठी मोहीम राबवली. त्यावेळी सुमारे ५० जणांना ताब्यात घेतले होते. पोलिसांची धरपकड सुरू असताना आवेज खान हा पोलिसांच्या नजरेआड राहण्यासाठी उत्तर प्रदेशात गेल्याचे आता समोर आले आहे. आवेज खान हा कृष्णा आंदेकरसोबत कोंढवा येथील मोक्का गुन्ह्यात सहआरोपी असल्याची माहिती समोर आली आहे.
आंदेकर टोळीने सूड उगवण्यासाठी टप्प्याटप्प्याने हल्ल्यांचे नियोजन केल्याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात सुरू आहे. वनराज आंदेकर यांच्या खूनानंतर प्रथम आयुष कोमकर, नंतर गणेश काळे आणि आता अक्षय म्हस्के याच्यावर झालेला जीवघेणा हल्ला, या सर्व घटनांमुळे बदल्याचे सत्र नियोजनबद्ध पद्धतीने राबवले जात असल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदेकर टोळीशी संबंधित हालचालींवर लक्ष केंद्रीत केले आहे.
पोलिसांचे फेल्युअर
आयुष कोमकरच्या खूनानंतर पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीच्या सर्वांची झडती घेतली. आंदेकर टोळीचे सदस्य, रेकॉर्डवर असलेले आरोपी इतकेच नव्हे तर अंधारातून मदत करणारे, काम करणारे व सोबत असलेल्यांना ताब्यात घेतले. सर्वांची माहिती गोळा केली. इतके असतानाही पोलिसांकडून आवेज खान हा नजरेतून सुटला गेल्याचेच आता सिद्ध होत आहे.
वनराजच्या खुनातील आरोपी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचे नियोजन आंदेकर टोळीने केले आहे, अशी माहिती पुणे पोलिस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. मात्र, माहिती असतानाही पोलिसांना हल्ले थांबवता येत नाहीत, असे चित्र आहे.