
बिष्णोई टोळीची सुत्रे हलतात पुण्यातून! गोळीबार अन् दहशतीने व्यावसायिकांमध्ये भिती
पुणे/अक्षय फाटक : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून आणि त्यानंतर पंजाब, हरियाणा आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये दहशतीचे जाळे निर्माण करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने महाराष्ट्रात देखील पाय रोवले आहेत. धक्कादायक म्हणजे, आता या टोळीकडून व्यापाऱ्यांना धमकावणे आणि त्यांच्याकडून खंडण्या उकळण्यासारखे गंभीर प्रकार सुरू झाले आहेत. विशेषत: या टोळीने महाराष्ट्रात व्याप्ती वाढवली असली, तरी त्याची सूत्रे पुण्यातूनच हलविली जात असल्याचे सातत्याने समोर येऊ लागले आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेपुढे मोठे या टोळीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
९ व्यापाऱ्यांकडून ५ कोटी खंडणीची मागणी
फुरसूंगी भागातील भागीदारीत स्टील व्यावसाय करणाऱ्या ९ व्यावसायिकांना प्रत्येकी ५ कोटीनुसार ५० कोटींची खंडणीची मागणी केल्याप्रकरणी आरजू बिष्नोई याच्यासह काही जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अद्याप तरी कोणाला अटक करण्यात आलेली नाही. गोळीबारापेक्षा भयंकर प्रकार म्हणजे, या गुन्ह्यात आधी खंडणीची मागणी करण्यासाठी फोन त्यावरून दोघांना धमकी आणि नंतर काही तासांतच गोळीबार घडवून आणणे. नंतर सोशल मिडीयावर एक घंटे में चमत्कार दिखा दिया असा मॅसेज टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रकार मानला जात आहे. यामुळे व्यावसायिकांच्या मनात प्रचंड भिती निर्माण झाली आहे.
काही दिवसांपुर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये बिष्नोई टोळीच्या नावानेच फर्निचर व्यावसायिकाच्या दुकानासमोर गोळीबार करण्यात आला होता. त्यातील काहींना अटक होताच, पुण्यातील व्यावसायिक टार्गेट करण्यात आले. धक्कादायक म्हणजे, ज्या दुचाकीवरून गोळीबार करणारे आरोपी आले, ती दुचाकी त्यांनी काही अंतरावर सोडून दिली. पण, या दुचाकीचा चासीनंबरही खोडून टाकला असल्याचे समोर आले आहे.
पुण्यातील घटना
मुंबईत ऑक्टोबर २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या केली होती. या करणाचा तपास पुढे सरकत असताना आरोपींचे बिश्नोई टोळीशी असलेले संबंध उघड झाले. त्याआधी सलमान खान यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार झाला होता. हे संपत असताना पुनावळे येथे फर्निचर मॉलवर गोळीबार झाला. याची जबाबदारीही बिष्नोई टोळीने घेतली. नंतर एका चित्रपट वित्त पुरवठादाराकडे ५ कोटींची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास बाबा सिद्दीकींसारखी अवस्था करू अशी धमकी दिली होती. आता फुरसूंगीतील व्यावसायिकाच्या गोडाऊनवर गोळीबार करण्यात आला.
टोळीचे सूत्रे पुण्यातून?
बिष्नोई टोळीचा तसा महाराष्ट्र तसेच पुणे किंवा मुंबईशी संबंध नाही. पण, या सर्वांमध्ये जिल्ह्यातील शुभम लोणकर या एका तरुणामुळे बिष्नोई टोळीने पाय रोवण्यास सुरूवात केली असल्याचे पोलिस सांगतात. बाबा सिद्दीकी हत्ये प्रकरणात प्रमुख सूत्रधार म्हणून त्याचे नाव आहे.
गँगचे पुणे कनेक्शन
सिद्धू मुसेवाला हत्येच्या तपासात, पुणे ग्रामीण पोलिसांनी संतोष जाधवला गुजरातमधून अटक केली होती. जाधवला लपवून ठेवणारे नवनाथ सूर्यवंशी आणि सिद्धेश उर्फ महाकाल कांबळे यांनाही अटक झाली. तिघेही बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. संतोष जाधव हा आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावातील रहिवासी आहे, तर कांबळे नारायणगावचा आणि सूर्यवंशी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील आहे. २०२१ मध्ये, मंचर परिसरात पूर्वीच्या भांडणामुळे संतोष जाधवने ओंकार उर्फ राण्या बाणखेले याच्यावर गोळीबार करून त्याचा खून केला होता. त्यानंतर तो पळून गेला आणि बिष्णोई टोळीशी त्याचा संपर्क झाला. आमदार बाबा सिद्दीकी खून प्रकरणात पुण्यात या खूनापुर्वीच सोशल मिडीयावर धमकीचा मजकूर टाकल्याचे समोर आले होते.
हे सुद्धा वाचा : मला लग्न करायचं नाही सांगितलं होतं…, सिया गोयलच्या खुलाशाने लोहगड हत्याकांडात खळबळ
मोठे नेटवर्क कार्यरत!
महाराष्ट्रात मुख्यत: मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागात तरुणांना गँगमध्ये सहभागी करून मोठे नेटवर्क उभे केले आहे. किरकोळ कामांपासून रेकी, वाहनांची व्यवस्था, संपर्क साधणे अशा विविध स्वरूपाच्या कामांसाठी तरुणांचा वापर केला जात असल्याचा संशय आहे.