
वडापाव बेतला जीवावर, पुण्यात तरुणाचा खून; नेमकं काय घडलं?
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्याचा मध्यभाग असलेल्या गणेश पेठ परिसरात वडापाव खरेदीसाठी गेल्यानंतर पायाला धक्का लागल्यावरून वाद झाल्यानंतर तरूणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश पेठेतील डुल्या मारूती चौक परिसरात रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे.
शिवम राजेश परदेशी (वय २८, रा. गणेश पेठ) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी वैभव किशोर साळुंखे (वय २४, रा. गणेश पेठ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शिवम आणि वैभव दे दोघे गणेश पेठ परिसरात राहण्यास आहेत. दोघांची तोंड ओळख आहे. वैभव हा एका बिल्डरकडे अकाउंटंट म्हणून नोकरीस आहे. दोघांचेही वडील रिक्षा चालक आहेत. रविवारी दुपारी गणेश पेठेतील एका वडापावच्या गाडीवर दोघांचा एकमेकाला पाय लागला. यातून दोघांमध्ये वाद झाले. त्यातून वादाचे पर्यवसन मारहाणीत झाले. वैभव याने गणेशच्या छातीत जोरात बुक्या मारल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर शिवम भांडणानंतर घरी जाऊन झोपला होता. रात्री उशीरापर्यंत तो उठत नाही हे लक्षात आल्यावर घरच्यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. शेवटी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शी समोर आले आहे. हा प्रकार फरसखाना पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता तसेच नागरिक व त्यांच्या वादाची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने भांडणे झाल्याचे सांगितले. पुढील तपास फरासखाना पोलिस करत आहेत.