
फ्लॅट विकण्यास नकार दिल्याचा राग अनावर; एका बुक्कीत पत्नीचे नाक केले फ्रॅक्चर
पुणे : दोघांच्या नावावर असलेल्या फ्लॅटची विक्री करण्याबाबत कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यास पत्नीने नकार दिल्यानंतर त्याचा राग आल्याने पतीने जोरात ठोसा मारून पत्नीच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका ४५ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ४७ वर्षीय पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी १५ एप्रिल रोजी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार आणि आरोपी हे पती-पत्नी आहेत. त्या दोघांच्या नावावर वारजे येथील सारर्थ सिन्क्लेअर येथे फ्लॅट आहे. तो फ्लॅट विकण्याबाबत चर्चा चालु होती. तक्रारदार यांनी हा फ्लॅट विकण्याबाबत नकार दिला. हा फ्लॅट विकण्याबाबत कोणतीही सही करणार नाही, असेही म्हणाल्या. तेव्हा पतीने पत्नीला मोठ मोठ्याने वाईट शिवीगाळ केली. त्यांच्या नाकावर उजव्या हाताच्या पंज्याच्या मुठीने जोरात बुक्की मारली. त्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागले. पतीच्या मारहाणीत त्यांचे नाक फ्रॅक्चर होऊन त्या जखमी झाल्या आहेत. पोलिस हवालदार शिंदे तपास करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : बारामतीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांनी अमृता लॉजवर छापा टाकला अन्…
पाटसमधील टोलनाक्यावर कोयता गॅंगची दहशत
पुणे– सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाटस येथील टोलनाक्यावर चार-पाच जणांच्या टोळीने कोयत्यांनी टोल नाक्याची तोडफोड करत हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक टोल कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पाटस पोलिसांनी तीन जणांना पाठलाग करून ताब्यात घेतले असून, दोन जण फरार झाले आहेत. याबाबत प्राथमिक माहिती अशी की, पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोलनाक्यावर सोमवारी ( दि. १३) सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या आसपास टोल नाक्यावर लेन क्रमांक चार वर एक चार चाकी स्विफ्ट कार आली. या कार मधून चार-पाच जण हातात कोयत्यासारखे धारदार शस्त्र घेऊन खाली उतरत थेट त्यांनी टोल नाक्यावर हल्ला केला. कोयत्याने टोलनाक्याच्या काचा फोडल्या, टोल कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही तोडफोड करून लेनवर पुढे जाऊन परत वळून पुन्हा टोलवर कोयत्याने हल्ला चढवत तोडफोड करण्यास सुरुवात केली. दरम्यान, या हल्ल्यात एका टोल कर्मचाऱ्याच्या हातावर कोयत्याचा वार बसल्याने तो किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. अचानक गाडीतून चार-पाच जण उतरतात आणि थेट कोयत्यांनी हल्ला चढवतात. या घटनेमुळे टोल नाक्यावर काही काळ महामार्गावरुन प्रवास करणारे वाहन चालक आणि प्रवासी यांच्यामध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.