फोटो सौजन्य- ECI
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना प्रशासनाकडून मतदानाकरिता जोरदार तयारी केली जात आहे. यासाठी मतदान केंद्रांच्या उभारणीसंबंधी नियोजन करताना महिला निंयत्रित मतदान केंद्र स्थापित करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयास केले गेले आहेत. राज्यात ४२६ मतदानकेंद्रे हे महिला नियंत्रित करणार आहेत. महिला निंयत्रित मतदान केंद्राकरिता केंद्रीय निवडणूक आयोगा आग्रही होते त्यामुळेच त्यांनी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे निर्देशही दिले होते.
केंद्रांमध्ये सर्वच आघाडीवर असणार महिला
या महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये सर्वच आघाडीवर महिला असणार आहेत. त्यामध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग असेल. राज्यात लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महिला नियंत्रित महिला मतदान केंद्र असणार आहेत. निवडणूक आयोगाकडून दिलेल्या निर्देशानुसार सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर होणार नाही याची काळजी घेण्यात येईल.
नाशिकमध्ये सर्वाधिक महिला नियंत्रित मतदान केंद्र
नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ४५ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. त्यानंतर जळगावमध्ये ३३, गोंदिया ३२ आणि सोलापूर २९, मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली , हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील.
महिला नियंत्रित मतदान केंद्र
‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्याच्या या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास फार मदत होणार आहे. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितताही लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे.
जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्र
नागपूर १३, नांदेड ९, नंदुरबार ४, उस्मानाबाद ४, पालघर ६, परभणी ८, पुणे २१, रायगड ९, रत्नागिरी ६, सांगली ८, सातारा १७, ठाणे १८, वर्धा ९ अहमदनगर १२, अकोला ६, अमरावती ८, औरंगाबाद १३, बीड ८, भंडारा ८, बुलढाणा ७, चंद्रपूर ९, धुळे ५, जालना ६, कोल्हापूर १०, लातूर ६, यवतमाळ ७ आणि मुंबई शहर १२
राज्यात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. 23 नोव्हेंबरला राज्यात मतमोजणी केली जाणार आहे.