File Photo : Sharad Pawar
कोरेगाव : राज्यातील महायुती सरकारच्या धोरणामुळे संपूर्ण देशाला जगविणारा पोशिंदा असलेला शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, महिलांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या सरकारला या गोष्टी थांबवता येत नाहीत, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. सरकार बदलण्याची वेळ आली असून कर्तृत्त्ववान माणसांच्या हाती राज्य सरकार द्यायचे आहे. कोरेगावातील शशिकांत शिंदे यांच्यासारखी कर्तृत्त्ववान माणसं या निवडणुकीत विजयी करावीत, असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.
हेदेखील वाचा : मतासाठी शपथ घेणाऱ्या उमेदवाराला मतदान न करण्याचा स्वाभिमानी जनतेचा निर्धार : समरजीतसिंह घाटगे
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ रहिमतपूर रस्त्यावरील भंडारी मैदानावर शनिवारी शरद पवार यांची प्रचारसभा झाली. त्यावेळी त्यांनी भाजपसह सरकारवर आपल्या शैलीत टीका केली. व्यासपीठावर आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह माजी आमदार बाबुराव माने, आमदार अरुण लाड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार यांनी शेतकरी आत्महत्या कशाने का होतात, यावरील उदाहरण दिले. राज्यातील भाजप सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार उरला नाही, त्यांनी सर्वसामान्य जनतेला विशेष करून महिलांना संरक्षण दिले नाही. अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे. संपूर्ण देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी वर्ग शेतमालाला योग्य किंमत मिळत नसल्याने आत्महत्या करत आहे, हे महाराष्ट्राचे चित्र आता बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. या सरकारला बदलायचे असेल तर कर्तृत्ववान माणसांच्या हाती राज्य देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
शशिकांत शिंदे सर्वसामान्य जनतेसाठी लढण्यास तयार
कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचा नामोल्लेख नामोल्लेख टाळत शरद पवार यांनी मतदारसंघातील दहशतीबाबत भाष्य केले. शशिकांत शिंदे हे कसे योग्य उमेदवार आहे, याबाबत माहिती दिली. अनेक वर्ष सर्वसामान्य जनता आणि माथाडी कामगार यांच्यासाठी ते अहोरात्र काम करत आहेत. एक-दोन निवडणुकीत त्यांना यश आले नाही, लोकसभा निवडणुकीत सामान्य जनता त्यांच्या पाठीशी होती. मात्र, निवडणूक चिन्हामुळे त्यांचा पराभव झाला, असे स्पष्ट करत शशिकांत शिंदे सर्वसामान्य जनतेसाठी लढण्यास तयार आहेत.
पाण्याच्या नावाखाली मतदारसंघात राजकारण सुरू
सध्या पाण्याच्या नावाखाली मतदारसंघात राजकारण सुरू आहे. मते द्या नाही तर पाणी देणार नाही, असा स्पष्ट इशारा विरोधकांकडून जनतेला दिला जातो. महाराष्ट्रातील पाणी वाटपाचा समतोल या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमुळे ढासळला असून, त्यांनी राज्यात पाण्यावरून संघर्ष वाढवला असल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला.