
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Janmashtami Song: जन्माष्टमीचा सण जवळ आला की भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीगीतांनी आणि भजनांनी वातावरण भक्तिमय होतं. मंदिरांमध्ये मध्यरात्री कृष्णजन्माचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, तर दहीहंडीची तयारीही काही दिवस आधीपासूनच सुरू होते. या उत्सवात कृष्णाला समर्पित गाणी आणि भजनांना विशेष महत्त्व असतं. बॉलिवूडमध्येही श्रीकृष्णाच्या भक्तीवर अनेक अविस्मरणीय गाणी तयार झाली आहेत. मात्र, यापैकी एक भजन असं आहे, ज्याची लोकप्रियता तब्बल ४८ वर्षांनंतरही कायम आहे.
‘यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला’ हे गाणं जन्माष्टमीच्या काळात आवर्जून ऐकायला मिळतं. लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या सुमधुर आवाजाने सजलेलं हे भजन आजही सगळ्यांच्या मनात विशेष स्थान करून आहे.
या गाण्याचे बोल पंडित नरेंद्र शर्मा यांनी लिहिले होते, तर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी त्याला संगीत दिलं होतं. कृष्ण आणि यशोदा यांच्यातील निरागस संवाद या गाण्यातून सुंदरपणे मांडण्यात आला आहे.
OTT Movies: जन्माष्टमी स्पेशल! श्रीकृष्ण आणि महाभारतावर आधारित ‘हे’ खास OTT सिनेमे-शोज नक्की पाहा
हे लोकप्रिय भजन ‘सत्यम शिवम सुंदरम’ या १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे, या गाण्यात बालकलाकार म्हणून पद्मिनी कोल्हापुरे दिसल्या होत्या.
चित्रपटात त्यांनी रूपा म्हणजेच झीनत अमान यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. लहान रूपा दररोज सकाळी मंदिरात जाऊन भगवान कृष्णाची पूजा करताना दिसते. तिची अढळ श्रद्धा आणि निरागस भक्ती पाहून गावकरीही प्रभावित होतात.
पद्मिनी कोल्हापुरे यांनी वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी साकारलेली ही भूमिका आणि लता मंगेशकरांचा मधुर आवाज यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून राहिलं.
१९७८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा राज कपूर दिग्दर्शित चित्रपट होता. या सिनेमात झीनत अमान आणि शशी कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
चित्रपटाची कथा रूपाभोवती फिरते. तिच्या चेहऱ्याचा अर्धा भाग जळालेला असतो. शशी कपूर यांनी साकारलेलं पात्र केवळ रूपाचा आवाज ऐकून तिच्या प्रेमात पडतं. मात्र, तिचा चेहरा पाहिल्यानंतर त्याला धक्का बसतो आणि तो तिच्यापासून दूर जातो. त्यानंतर कथेला वेगळं वळण मिळतं.
‘सत्यम शिवम सुंदरम’च्या माध्यमातून राज कपूर यांनी बाह्य सौंदर्य आणि आंतरिक सौंदर्य यातील फरक अधोरेखित केला होता. समाज एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरून तिचं मूल्य ठरवतो, या मानसिकतेवरही चित्रपटातून भाष्य करण्यात आलं.
मात्र, या गंभीर आशयासोबतच ‘यशोमती मैया से बोले नंदलाला’सारख्या भक्तिगीतांनी चित्रपटाला एक वेगळीच भावनिक आणि आध्यात्मिक उंची दिली. त्यामुळे जवळपास पाच दशकांनंतरही जन्माष्टमीच्या काळात हे गाणं तितकंच लोकप्रिय आहे.