
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Mahakavya Shri Ramayan Katha Teaser: यंदाच्या दिवाळीत दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुप्रतिक्षित ‘रामायण’ मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी सीता आणि कन्नड सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याने या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. तब्बल ४००० कोटी रुपयांच्या बजेटमुळेही या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.
मात्र, नितेश तिवारींच्या ‘रामायण’सोबतच रामायणावर आधारित आणखी एका चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. ‘महाकाव्य श्री रामायण कथा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यातील कलाकारांच्या निवडीवरून सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. विशेषतः ‘लॉक अप’ फेम अंजली अरोरा सीतेच्या भूमिकेत दिसणार असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘महाकाव्य श्री रामायण कथा’च्या टीझरची सुरुवात सीतेच्या स्वयंवराच्या प्रसंगाने होते. यामध्ये श्रीराम सीतेला पुष्पहार घालताना दिसतात. त्यानंतर राम, लक्ष्मण आणि सीता वनवासासाठी निघाल्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे.
पुढे वनवासातील प्रसंग, सीतेचे रावणाकडून अपहरण आणि राम-सीतेच्या विरहाचे काही भावनिक क्षण पाहायला मिळतात. टीझरच्या शेवटी रावणाला उद्देशून श्रीरामांचा संवाद ऐकू येतो, ज्यामध्ये सीता रामाचीच असल्याचे सांगितले जाते.
या चित्रपटात देव शर्मा श्रीरामाच्या भूमिकेत, तर अंजली अरोरा सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, अंजलीच्या कास्टिंगवरून सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
अंजली अरोरा ‘कच्चा बदाम गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झाली होती. आता तिला थेट सीतेच्या भूमिकेत पाहिल्यानंतर काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडिया यूजर्सनी निर्मात्यांनी या भूमिकेसाठी अंजलीची निवड का केली, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
काही यूजर्सनी या कास्टिंगला धार्मिक भावनांशी जोडत टीका केली आहे. एका यूजरने, “माँ सीतेच्या भूमिकेत अंजली अरोरा? खरंच?” अशी प्रतिक्रिया दिली. तर आणखी एका यूजरने सीतेची भूमिका साकारताना श्रद्धा, प्रतिष्ठा आणि संवेदनशीलतेचा विचार केला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
काहींनी तर या कास्टिंगला लोकांच्या श्रद्धेची चेष्टा असल्याचेही म्हटले आहे.
अंजली अरोराच्या कास्टिंगसोबतच टीझरमधील एका गोष्टीनेही प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. टीझरमध्ये ‘कृष्णाय वासुदेवाय…’ हा मंत्र ऐकू येतो. त्यामुळे काही प्रेक्षकांनी निर्मात्यांच्या या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
भगवान राम हे त्रेतायुगातील भगवान विष्णूचे सातवे अवतार, तर भगवान कृष्ण हे द्वापरयुगातील आठवे अवतार मानले जातात. त्यामुळे रामायणाच्या कथानकात कृष्णाशी संबंधित मंत्राचा वापर का करण्यात आला, असा सवाल सोशल मीडिया यूजर्स करत आहेत.
एका बाजूला रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या नितेश तिवारींच्या ‘रामायण’ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर दुसरीकडे ‘महाकाव्य श्री रामायण कथा’चा टीझर प्रदर्शित होताच त्यातील कास्टिंग आणि काही दृश्यांवरून वाद सुरू झाला आहे.
आता प्रेक्षक या चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात आणि अंजली अरोरा सीतेच्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकते का, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
Ayesha Khan Engagement: आयशा खानने गुपचूप उरकला साखरपुडा? मिस्ट्री मॅनसोबत रोमँटिक फोटो व्हायरल