
फोटो सौजन्य - Social Media
‘ज्याच्याकडे अश्वबल त्याची पृथ्वी आणि ज्याच्याकडे समर्थ आरमार त्याचा समुद्र’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदर्शी विचाराला केंद्रस्थानी ठेवून ‘दर्याभवानी’ची कथा आकाराला आली आहे. हिंदवी स्वराज्याच्या सागरी संरक्षणाची उभारणी, आरमाराची निर्मिती, जलदुर्गांची रणनीती आणि समुद्रावर मराठ्यांनी निर्माण केलेलं वर्चस्व या सर्वांचा भव्य आणि थरारक पट या चित्रपटातून उलगडणार आहे. शिवरायांच्या सागरी दूरदृष्टीचा हा महत्त्वपूर्ण अध्याय प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर सिनेमाच्या माध्यमातून साकारला जाणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती श्री तिरुपती बालाजी चित्रचे प्रकाश पाटील, डॉ. अशोक जीवतोडे, अजिंक्य पाटील तसेच एलेवेट फिल्म्सचे पवन सादमवार आणि सुरज सादमवार यांनी केली आहे. पुष्कर यावलकर हे सहनिर्माते असून दीठी प्रॉडक्शन्स चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. यापूर्वी ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘सुभेदार’ आणि ‘रणपति शिवराय’ या चित्रपटांद्वारे शिवकालीन इतिहास प्रभावीपणे मांडणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ मालिकेतील हा सातवा चित्रपट असल्याने त्याबद्दल विशेष उत्सुकता आहे.
निर्माते प्रकाश पाटील यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी सामर्थ्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जात आहे. सखोल संशोधन, वास्तवदर्शी मांडणी आणि भव्य निर्मितीमूल्यांच्या जोरावर ‘दर्याभवानी’ प्रेक्षकांसाठी संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले की, शिवरायांचा इतिहास हा फक्त गड-किल्ल्यांपुरता मर्यादित नसून समुद्रावर स्वराज्याची पताका फडकवणाऱ्या दूरदृष्टीचाही इतिहास आहे. ‘दर्याभवानी’च्या माध्यमातून शिवरायांच्या आरमार निर्मितीचा प्रवास, जलदुर्गांचे महत्त्व आणि सागरी संरक्षण व्यवस्थेची ताकद प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या चित्रपटात अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे, अजय पूरकर, मृण्मयी देशपांडे, ऋषी सक्सेना, आस्ताद काळे, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, नितीन वाघ आणि सचिन देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे लेखन दिग्पाल लांजेकर यांनी केले असून नितीन वाघ यांनी सहलेखक म्हणून योगदान दिले आहे. स्मिता शेवाळे या क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. विजय खडके यांनी छायांकन, केदार दिवेकर आणि अवधूत गांधी यांनी संगीत, तर दिग्पाल लांजेकर यांनी गीतलेखनाची जबाबदारी सांभाळली आहे. निखिल लांजेकर (ध्वनी), प्रतीक रेडीज (कला दिग्दर्शन), बब्बू खन्ना (साहसदृश्य), सुमित साळुंखे (नृत्यदिग्दर्शन), रोहिणी साळेकर (वेशभूषा) आणि अतुल म्हस्के (रंगभूषा) यांनी चित्रपटाच्या तांत्रिक बाजू अधिक भक्कम केली आहे.