
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील Aai Tuljabhavani या मालिकेत लवकरच “मांढरदेवी महात्म्य” या नव्या दैवी पर्वाचा भव्य प्रारंभ होणार आहे. या नव्या अध्यायात भक्ती, श्रद्धा आणि शक्तीची अद्भुत कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. श्रद्धा, शक्ती आणि अवताराची अद्भुत गाथा. एका बाजूला असुरी शक्तींचा कहर, तर दुसऱ्या बाजूला एका सामान्य स्त्रीची अढळ श्रद्धा या संघर्षातून उलगडणार आहे एक दिव्य चमत्कार, जिथे भक्तीच देवत्वाला आव्हान देते.
असुरी शक्तींनी वेढलेल्या, काळ्या धुरात हरवलेल्या एका गावात जिथे कुठलीही हाक देवांपर्यंत पोहोचत नाही तिथे उभी आहे ऋषीपत्नी मांडाबाई. जखमी, कष्टी, पण अजूनही न डगमगलेली… लाख्यासुराच्या अत्याचारांनी गाव उद्ध्वस्त झालंय, लोकांनी आशा सोडली आहे; पण ती मात्र स्वतःच्या भीतीशी आणि नियतीशी लढत खंबीरपणे उभी आहे. दूरवर आई तुळजाभवानीला या संकटाची जाणीव होते, मात्र लाख्यासुराच्या असुरी तंत्रामुळे तिच्याही शक्तींना मानवी रूपात मर्यादा आल्या आहेत. एक धाडसी निर्णय घेत मांडाबाई निघते दुर्गम डोंगराच्या दिशेने जिथून तिची साद देवीपर्यंत पोहोचू शकते. हा प्रवास केवळ डोंगर चढण्याचा नाही, तर श्रद्धा, धैर्य आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा आहे. तिच्या एका आर्त हाकेने तुळजाभवानीच्या अंतरंगातील शक्ती जागृत होते.आदिशक्तीचा अंश जागृत होतो. तुळजाभवानीच्या करकमलातून निघालेलं तेज मांडाबाईमध्ये सामावतं आणि एका सामान्य स्त्रीचं रूपांतर होतं एका प्रचंड शक्तिशाली देवी शक्तीत होते. भक्ती आणि शक्ती यांच्यातली सीमा धूसर होत असताना, एक नवा अवतार अधर्माच्या अंतासाठी सज्ज होतो.
या कथेत मांढरदेवी आणि तुळजाभवानी यांच्या दैवी शक्तींची साथ असुरी शक्तींविरुद्ध कशी उभी राहते, हे दाखवले जाणार आहे. या संघर्षातून एक रोमहर्षक कथा उलगडेल.मांडाबाईच्या मजबूत श्रद्धा आणि धैर्यावर आधारित ही गोष्ट प्रेक्षकांना खूप भावणारी आणि प्रेरणादायी ठरणार आहे. श्रद्धा, शक्ती आणि दैवी चमत्कार यांचा सुंदर संगम या पर्वात पाहायला मिळेल.
Aai Tuljabhavani ही एक मराठी पौराणिक मालिका आहे जी देवी तुळजाभवानी यांच्या भक्ती, शक्ती आणि चमत्कारांवर आधारित कथा दाखवते.या मालिकेत श्रद्धा, धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष दाखवला जातो. एका बाजूला असुरी शक्ती आणि अंधकार आहे, तर दुसऱ्या बाजूला देवीची शक्ती आणि भक्तांची अढळ श्रद्धा दाखवली जाते.मालिकेची कथा प्रामुख्याने देवीच्या चमत्कारांभोवती फिरते आणि भक्तांच्या जीवनात देवी कशी संकटातून मार्ग काढते हे दाखवले जाते. त्यामुळे ही मालिका भावनिक, आध्यात्मिक आणि पौराणिक स्वरूपाची आहे.