
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नाट्य दिग्दर्शक कुमार सोहोनी हे मराठी रंगभूमीवरील एक प्रयोगशील आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व मानले जाते. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी सतत नवनवीन प्रयोग केले असून, नवीन संहिता शोधणे, नवोदित कलाकारांना संधी देणे आणि प्रत्येक नाटकात वेगळेपण आणणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य राहिले आहे.त्यांच्या या प्रदीर्घ आणि यशस्वी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचं १२५वं नाटक ‘भुल भुलैय्या’. हे नाटक प्रेक्षकांसमोर एक अनोखा प्रयोग म्हणून सादर होत असून, त्यांच्या दीर्घ नाट्यकारकिर्दीतील एक विशेष आणि महत्त्वपूर्ण मैलाचा दगड मानला जात आहे.
ब्बल ५३ वर्षांची अखंड नाट्यसेवा आणि १२५ नाट्यकृतींचा समृद्ध अनुभव पाठीशी असलेल्या नाट्यदिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी आपल्या नव्या नाटक ‘भुल भुलैय्या’ द्वारे एक वेगळी कलात्मक दिशा शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत प्रयोगशीलता हे नेहमीच प्रमुख वैशिष्ट्य राहिले असून, या नव्या नाटकातूनही तेच प्रतिबिंबित होत आहे.‘भुल भुलैय्या’ या नाटकाचे निर्माते केदार सामंत आणि रणजीत देसाई हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील असून, ते अनेक वर्षांपासून ‘बाबा वर्दम थिएटर्स’ या हौशी नाट्य संस्थेशी जोडलेले आहेत. ही संस्था गेल्या ५४ वर्षांपासून हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवर सक्रिय आहे.या संस्थेच्या माध्यमातून दोन्ही निर्माते गेल्या २८ वर्षांपासून नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत. राज्यभरातील कलाकारांना व्यावसायिक रंगभूमीवर संधी मिळावी या उद्देशाने त्यांनी ‘श्री लक्ष्मीनारायण प्रॉडक्शन्स’ या संस्थेची स्थापना केली.
केदार सामंत यांनी आतापर्यंत १३ नाटके, ६ बालनाट्ये आणि ६ एकांकिका यांचे दिग्दर्शन केले असून, त्यांनी अनेक नाटकांमध्ये अभिनय आणि तांत्रिक जबाबदाऱ्या देखील सांभाळल्या आहेत. तर रणजीत देसाई यांनी नाटकांचे व्यवस्थापन आणि विविध नाट्य महोत्सवांचे आयोजन करून रंगभूमीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
‘नाटकाची कथा ऐकल्यानंतरच हे नाटक करण्याचा मी निर्णय घेतल्याचे कुमार सोहोनी सांगतात. कथेत असा वेगळा गाभा होता की त्यावर नाटक होऊ शकतं, हे स्पष्ट जाणवलं आणि त्यामुळेच हा प्रयोग करण्याचं ठरवलं’. या नाटकाचा फॉर्म पारंपरिक चौकटींपेक्षा पूर्णतः वेगळा आहे. विज्ञान, वास्तुशास्त्र आणि तंत्र-मंत्र या तीनही घटकांच्या साह्याने ‘आत्म्याचा शोध’ घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे हे नाटक केवळ फॅण्टसी नसून, एक सखोल आणि विचारप्रवर्तक शोधयात्रा आहे.
मराठी रंगभूमीवर अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच सादर होत असल्याचं कुमार सोहोनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आशय, मांडणी आणि सादरीकरण या तीनही स्तरांवर वेगळेपण जपणारे हे नाटक प्रेक्षकांना एक नवीन अनुभव देईल,असा विश्वास यावेळी नाटकाच्या टीमने व्यक्त केला. कुमार सोहोनी यांचा हा प्रयत्न नक्कीच रसिकांच्या उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.
‘Bhooth Bangla’ फिव्हर: ‘भूत बंगला’ची क्रेझ वाढली; अक्षय कुमारच्या क्वर्की स्टाईलने जिंकली मनं
‘रंगत संगत’आणि ‘श्री लक्ष्मीनारायण प्रॉडक्शन्स’ निर्मित ‘भुल भुलैय्या’ नाटकाची कथा हेमंत एदलाबादकर यांची असून रंगावृत्ती, दिग्दर्शन, प्रकाश कुमार सोहोनी यांचे आहे. रणजित देसाई, केदार सामंत नाटकाचे निर्माते आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे, साहिल देसाई, परिणिता पावसकर, आरती सोळंकी, अमीर तडवळकर, आशुतोष घोरपडे, विजय सूर्यवंशी हे कलाकार नाटकात आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे तर संगीत विजय गवंडे यांचे आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांनी केली आहे. सूत्रधार-विजय सूर्यवंशी आहेत.
‘भुल भुलैय्या’ नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग रवि १९ एप्रिल दु. ४.०० वा. रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, सोम २० एप्रिल रात्रौ ८.०० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर, ठाणे मंगळ २१एप्रिल दु. ४.०० वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले येथे रंगणार आहेत.