
अनिकेत-छवीच्या नात्यात वाढतोय गोडवा, पण शांभवीच्या कारस्थानांनी वाढली चिंता; ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये रंगणार नवा संघर्ष
एकीकडे अनिकेत आणि छवी आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्या मार्गातील अडचणी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. शकुंतलाला सोडवण्यासाठी अनिकेतने उचललेलं पाऊल त्याच्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. त्यातच अचानक निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे अनिकेतसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्याला एका धोकादायक सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याने आगामी भागांमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, शांभवीच्या प्रत्येक आव्हानाला छवीने दमदार आणि सडेतोड उत्तर दिलं आहे. शांभवीसमोर छवीने आत्मविश्वासाने उभं राहत, “आजचा दिवस तुझा होता, पण लवकरच आम्ही मानाने या घरात परत येऊ,” असं म्हणत तिला थेट चॅलेंज दिलं आहे. छवीच्या या वक्तव्यामुळे राजगुरू कुटुंबातील संघर्षाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. या सगळ्या तणावाच्या वातावरणात अनिकेत आणि छवीच्या नात्यातील प्रेम आणि विश्वासही अधिक घट्ट होताना दिसत आहे. संकटाच्या प्रत्येक टप्प्यावर अनिकेत छवीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आहे. त्यामुळे दोघांमधील नात्याचा गोडवा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
दुसरीकडे, बाईजींना छवी आणि अनिकेतची लागलेली काळजी आणि शांभवीच्या कारस्थानांमागचं सत्य समोर येण्याची शक्यता यामुळे कथानक अधिक उत्कंठावर्धक बनलं आहे. आता छवी खरंच राजगुरूंच्या घरात मानाने परतणार का? शांभवी तिचं चॅलेंज स्वीकारून कोणता नवा डाव खेळणार? अनिकेतवर आलेलं आर्थिक संकट नेमकं काय आहे आणि तो या संकटातून कसा बाहेर पडणार? या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांत मिळणार आहेत. ‘मी जिंकून घेईन सारं’ दररोज संध्याकाळी ७ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही JioHotstar वर पाहता येईल.
Madhuri Dixit Comeback : २४ वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक; ‘धकधक गर्ल’च्या रिअॅलिटी शोची घोषणा