
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये स्वामींवरच खटला
स्वामींची न्यायपरीक्षा का होणार?
‘आई तुळजाभवानी’मध्ये चातुर्मास पर्वाची सुरुवात
Colors Marathi: ऑगस्ट महिना कलर्स मराठीवरील प्रेक्षकांसाठी भक्ती, अध्यात्म आणि नाट्यमय घडामोडींनी भरलेला ठरणार आहे. “महिना स्वातंत्र्याचा, कलर्स मराठीच्या महानाट्याचा” या विशेष उपक्रमांतर्गत ‘जय जय स्वामी समर्थ’ आणि ‘आई तुळजाभवानी’ या लोकप्रिय मालिकांमध्ये प्रेक्षकांना भव्य महानाट्य अनुभवायला मिळणार आहे.
‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत प्रथमच एक अनोखा प्रसंग पाहायला मिळणार आहे. एका जोडप्याच्या नवजात बाळाला बारशाच्या दिवशी स्वामी स्वतःकडे सोपवण्याची मागणी करतात. ही मागणी दिवसेंदिवस तीव्र होत जाते आणि त्यामागील कारण समजण्यापूर्वीच स्वामींवर भक्तांकडूनच खटला दाखल केला जातो.
स्वामींना न्यायपरीक्षा का द्यावी लागते? त्यांच्या या कृतीमागील उद्देश काय असतो? या प्रश्नांची उकल आगामी भागांमध्ये होणार असून, मालिकेत भावनिक आणि रहस्यमय वळण पाहायला मिळणार आहे.
दुसरीकडे, ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत चातुर्मास पर्वाची सुरुवात झाली आहे. देवीभक्त उषाच्या सोळा सोमवारच्या व्रताची आणि श्रद्धेची कठोर परीक्षा घेतली जाणार आहे.
कथानकानुसार, असुरी शक्ती भक्तांच्या मनात संशय, मोह आणि अधर्म निर्माण करून त्यांना भक्तीमार्गापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, आई तुळजाभवानी या संकटांवर मात करत भक्तांच्या श्रद्धेचे रक्षण कसे करते, हे या महानाट्यात पाहायला मिळणार आहे.
‘जय जय स्वामी समर्थ’मधील स्वामींची न्यायपरीक्षा आणि ‘आई तुळजाभवानी’मधील चातुर्मास पर्वातील दैवी शिकवण यामुळे ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांना भक्ती, अध्यात्म, रहस्य आणि भावनिक नाट्याचा अनोखा अनुभव मिळणार आहे.
‘जय जय स्वामी समर्थ’ दररोज रात्री ८.१० वाजता, तर ‘आई तुळजाभवानी’ दररोज रात्री ८.५० वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे.