
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
झी मराठीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेबाबत उत्सुकता वाढत आहे. या मालिकेत अभिनेत्री ट्विंकल यादव ‘गौरी’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून, तिच्या व्यक्तिरेखेबद्दल तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत.
कृष्णाईच्या तीन मुलींमधील मधली मुलगी असलेली गौरी खंबीर, आत्मविश्वासू आणि जिद्दी स्वभावाची आहे. आईवर जीवापाड प्रेम करणारी गौरी कुटुंबासाठी कोणत्याही संकटाला सामोरी जाण्यास तयार असते. आईने आयुष्यभर केलेला संघर्ष आणि त्याग तिने जवळून पाहिल्यामुळे तिचं आईशी अतूट नातं आहे. मात्र, वडिलांविषयी तिच्या मनात खोलवर रागही दडलेला आहे. या भावनिक संघर्षासोबतच गौरीचं मोठं स्वप्न म्हणजे कलेक्टर होण्याचं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी ती सातत्याने प्रयत्न करताना दिसणार आहे.
ट्विंकल सांगते की, गौरीचं पात्र तिला सुरुवातीपासूनच स्वतःशी जोडलेलं वाटलं. तिचा स्वभाव, निरागसपणा आणि कुटुंबाविषयीची भावना या अनेक गोष्टी स्वतःसारख्या असल्यामुळे हे पात्र साकारणं तिच्यासाठी खास ठरलं. सांगली जिल्ह्यातील भिलवडी गावाशी असलेली तिची नाळही या भूमिकेशी जोडली गेली.
या भूमिकेसाठी ट्विंकलने कायदे, महिला सुरक्षा, सामाजिक प्रश्न आणि प्रशासनाशी संबंधित विषयांचा अभ्यास केला आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतील गौरीची भाषा आणि बोलण्याची शैली आत्मसात करण्यासाठीही तिने विशेष मेहनत घेतली.
मालिकेच्या प्रोमोला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल बोलताना ट्विंकलने सांगितलं की, लोक तिला आता ‘गौरी’ म्हणून ओळखू लागले आहेत. हा अनुभव तिच्यासाठी खूप आनंददायी आणि प्रेरणादायी आहे. साताऱ्यात सुरू असलेल्या शूटिंगदरम्यानचा पहिला दिवसही तिच्यासाठी अविस्मरणीय ठरला. पहिल्याच दिवशी अॅक्शन सीन करताना पाय मुरगळला, तरीही कामाचा उत्साह कायम होता.
या अनुभवाबद्दल बोलताना ट्विंकल यादव म्हणाली, “मालिकेतील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे मला निवेदिता ताईंसोबत काम करण्याची संधी मिळणं. ही बातमी घरी कळताच कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नव्हता. मलाही खूप आनंद झाला होता, मात्र त्याचवेळी जबाबदारीची जाणीव आणि थोडीशी भीतीही मनात होती. इतक्या अनुभवी अभिनेत्रीसमोर काम करताना आपण कसं सादरीकरण करू, याची सतत चिंता वाटत होती. पण शूटिंगला सुरुवात झाल्यानंतर निवेदिता ताईंनी मला खूप आधार दिला. जसं एखादी आई आपल्या मुलीला प्रेमाने मार्गदर्शन करते, तसंच त्यांनी प्रत्येक टप्प्यावर माझा आत्मविश्वास वाढवला. त्यामुळे माझी भीती आणि ताण हळूहळू नाहीसे झाले.”
ती पुढे म्हणाली, “त्यांच्याकडून मला अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. प्रत्येकाशी आपुलकीने वागणं, चूक झाल्यास शांतपणे समजावून सांगणं आणि सेटवर सकारात्मक वातावरण निर्माण करणं, या गोष्टी मला खूप प्रेरणा देतात. त्यांच्या सहवासातून मी कलाकार म्हणूनच नव्हे तर व्यक्ती म्हणूनही खूप काही शिकत आहे.”
प्रेक्षकांना संदेश देताना ट्विंकल म्हणाली, “’कृष्णाईच्या लेकी’ ही केवळ एक मालिका नाही, तर नातेसंबंध, स्वप्नं, संघर्ष आणि आशा यांची भावनिक कहाणी आहे. या कथेत प्रत्येकाला स्वतःचं किंवा आपल्या आसपासच्या व्यक्तींचं प्रतिबिंब पाहायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षकांनी ही मालिका आवर्जून पाहावी आणि आम्हाला त्यांचं प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंबा असाच मिळत राहावा, हीच अपेक्षा आहे.”‘कृष्णाईच्या लेकी’ ही नात्यांची, संघर्षाची, स्वप्नांची आणि आशेची कथा असल्याचं सांगत ट्विंकलने प्रेक्षकांनी मालिकेला भरभरून प्रेम द्यावं, असं आवाहन केलं.