
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मालिकाविश्वात पहिल्यांदाच शिवजयंती विशेष भाग पाहायला मिळणार आहे. झी मराठीवरील कमळी मालिकेतून‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे’ औचित्य साधत रायगड येथे आयोजित करण्यात आलेल्या अभ्यास सहलीतून इतिहास, मूल्ये आणि सामाजिक भान यांचा प्रभावी संगम प्रेक्षकांना पाहाता येणार. या निमित्ताने मालिकाविश्वात प्रथमच एखाद्या मालिकेचं शूटिंग गड किल्ल्यावर होत आहे. कमळीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘किल्ले रायगडावर’ अभ्यास सहलीच आयोजन केले आहे, ही केवळ सहल न राहता, स्वराज्याच्या विचारांशी पुन्हा एकदा जोडणारी जागृती मोहीम ठरणार आहे. कॉलेजचे विद्यार्थी कमळीच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश गडदर्शनापुरता मर्यादित न ठेवता इतिहास समजून घेणे, जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आणि तरुणाईला सकारात्मक दिशेने प्रेरित करणे या दृष्टीने बघत आहे.
सहलीदरम्यान रायगडावरील प्रत्येक ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगण्यात आले. शिवाजी महाराजांनी रायगडाची राजधानी म्हणून केलेली निवड, १६७४ साली पार पडलेला राज्याभिषेक सोहळा, गडाची भौगोलिक रचना आणि मजबूत संरक्षण व्यवस्था याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. इतिहास केवळ ऐकण्यापुरता न राहता अनुभवता यावा, या हेतूने विद्यार्थी चालत गड चढण्याचा निर्णय घेतात. या प्रवासातून श्रमदान, सहकार्य आणि शिस्त यांचे मोल ठळकपणे अधोरेखित झाले. बस बेस कॅम्पजवळ पोहोचताच या अभ्यास सहलीचा एक महत्त्वाचा क्षण अनुभवायला मिळातो. ऋषी सर विद्यार्थ्यांना संबोधित करत सांगतात, “हा आहे रायगड शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून निवडलेला किल्ला. सह्याद्रीच्या कुशीत ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर वसलेला हा प्रमुख गिरीदुर्ग. इथून वर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत रोपवे किंवा चालत. पण आपण चालत जाऊया, प्रत्येक गोष्ट एक्सप्लोर करत, इतिहास अनुभवत.”
या अभ्यास सहलीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे गडसंवर्धन आणि स्वच्छतेसाठी करण्यात आलेले श्रमदान. विद्यार्थ्यांनी गडावरील कचरा गोळा करणे, पाण्याच्या साठ्यांची स्वच्छता करणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली. “गडकिल्ले ही आपली जबाबदारी आहे” हा संदेश या कृतीतून देण्यात आला. आधुनिक सुविधा नसतानाही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न साकारले, ही जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात अधिक ठामपणे रुजली. सहलीचा समारोप शिवाजी महाराजांच्या समाधी दर्शनाने आणि सामूहिक शपथविधीने झाला. सामाजिक भान, स्त्रीसन्मान आणि योग्य वर्तन यावर ठाम भूमिका मांडत, “शिक्षा देऊन नव्हे तर समजावून आणि योग्य दिशा देऊन बदल घडवता येतो” हा विचार अधोरेखित करण्यात आला. रायगडावरून परतताना ही अभ्यास सहल केवळ एक आठवण न राहता, इतिहास जपण्याचा, समाजासाठी जबाबदार राहण्याचा आणि शिवाजी महाराजांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प बनून गेली. सर्वकलाकारांसाठी हा प्रवास विचारांचा प्रवास ठरला.
विजया बाबरनि रायगड किल्ल्यावर शूट करण्याचा आपला अनुभव व्यक्त करताना सांगितले ,“रायगडावर शूट करणं आमच्या सर्वांसाठी खरोखर भाग्याची गोष्ट होती. महाराजांच्या कर्मभूमीवर जाऊन काम करण्याची ही मुळातच माझी पहिली वेळ होती, त्यामुळे रायगडावर जाणं आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि तितकीच आदरपूर्वक जबाबदारीची भावना देणारं होतं. लहानपणापासून मनावर महाराजांचे संस्कार होत आलेले असतात. त्यांच्या अनेक कथा आपण ऐकलेल्या असतात आणि जसं जसं मोठं होत जातो, तसं तसं त्यांच्याविषयी अधिक शिकत जातो. ‘कमळी’ मालिकेमुळे मला अनेक गोष्टी शिकायला आणि त्यांच्या शौर्यकथा जाणून घ्यायला मिळत आहेत. रायगडावर शूट करताना खूप आनंद झाला. तिथे अनेक गोष्टी प्रत्यक्ष पाहायला आणि शिकायला मिळाल्या. आम्ही सतत एकाच विचारात होतो, ज्या वास्तूंवर एकेकाळी महाराज वावरले असतील, त्याच वास्तूंवर आज आपण वावरतो आहोत, याहून मोठी आणि अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी दुसरी नव्हती. ‘कमळी’ ही रायगडावर शूट करणारी पहिली मालिका आहे. आमचे निर्माते म्हणत होते की आपण एक बेंचमार्क निर्माण करत आहोत.
किल्ल्यावर आम्हाला लोकांचा प्रतिसाद प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला, विशेषतः लहान मुलांमध्ये. आपल्या मालिकेचा प्रभाव लोकांवर आणि लहान मुलांवर किती सुंदर संस्कार करत आहे, हे पाहून खूप समाधान वाटलं. त्या दिवशी अनेक शाळांच्या सहली आल्या होत्या. त्यांना ‘कमळी’ मालिका खूप आवडते आणि मालिकेत ज्या पद्धतीने महाराजांचे विचार मांडले जातात, तेही त्यांना भावतात असे त्यांनी व्यक्त केलं.
बालाजी मोशन पिक्चर्स निर्मित ‘रागिनी 3’ची घोषणा; तमन्ना भाटियासोबत झळकणार ‘ही’ संपूर्ण स्टारकास्ट
आम्ही तिथे तीन दिवस शूट करत होतो आणि त्या काळात मी अनेक लोकांसोबत फोटो काढले असावेत. इतकं प्रेम आणि आपुलकी पाहून मी अक्षरशः भारावून गेले. त्यांच्या या प्रेमाला अधिक चांगल्या कामातून आणि अधिक सुंदर प्रयत्नांतून प्रतिसाद द्यावा, हाच विचार सतत मनात होता.”
अनिल कपूर-राधिका मदान यांचा ‘लल्ला अँथम’ रिलीज; ‘सूबेदार’ च्या गाण्याला हरभजन सिंहची खास उपस्थिती