
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Mahima Mhatre: मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री महिमा म्हात्रे सध्या ‘तूला जपणार आहे’ या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेतील ‘मीरा’ या व्यक्तिरेखेमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून महिमा नाकावर आणि कपाळावर पट्टी लावून मालिकेचं शूटिंग करत होती. त्यामुळे चाहत्यांच्या मनातही अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
सोशल मीडियावरील कमेंट्समध्ये चाहते तिला वारंवार विचारत होते की, नाकावर पट्टी का आहे? नेमकं काय झालं? अखेर महिमाने या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. अभिनेत्रीने स्वतःसोबत घडलेला धक्कादायक अपघात सांगितला. हा प्रसंग सांगताना ती भावुक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले.
महिमाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं, “गेले काही महिने मी नाकावर अन् कपाळाला पट्टी लावून शूटिंग करतेय. सगळेच मला विचारत आहेत, नेमकं काय झालं होतं आणि इतके महिने तुम्ही पट्टी लावून का शूट करताय? त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला देणार आहे.”
पुढे ती म्हणते, “मध्यंतरी मी मालिकेत दिसत नव्हते, तेव्हासुद्धा प्रेक्षकांनी मला खूप मनापासून मिस केलं. माझ्या सगळ्या चाहत्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे, कारण आज मी ही नाकावरची पट्टी काढतेय.”
आता उपचार पूर्ण झाल्यानंतर लवकरच ती मालिकेच्या एपिसोडमध्ये पूर्वीप्रमाणे दिसणार असल्याचंही महिमाने सांगितलं.
मालिकेत मीरा ही धाडसी व्यक्तिरेखा दाखवण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत महिमाने अनेक अॅक्शन आणि कठीण सीन्स केले आहेत. असाच एक सीन तिच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला.
महिमा सांगते की, मीरा अथर्वचा जीव वाचवण्यासाठी घोड्यावर स्वार होऊन त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, असा सीन शूट करण्यात येत होता. यासाठी संपूर्ण टीम उत्सुक होती. मैदानात शूटिंग सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे दोन-तीन शॉट्सही व्यवस्थित पार पडले.
मात्र, शेवटचा शॉट घेत असताना अचानक घोडा प्रचंड वेगाने धावू लागला.
महिमाच्या म्हणण्यानुसार, ती आणि अथर्व दोघेही घोड्यावर होते. शॉट कट झाल्यानंतर अचानक घोडा उधळला. तिने घोड्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, लगाम खेचला; मात्र घोडा काही केल्या थांबत नव्हता.
“त्या क्षणाला मला काहीच समजलं नाही. मी घोड्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, लगाम खेचला; पण काही केल्या तो घोडा कंट्रोल होत नव्हता. शेवटी आम्ही दोघंही पडलो,” अशी आठवण महिमाने सांगितली.
दोघेही खाली पडल्यानंतर सेटवरील सर्वजण त्यांच्याकडे धावत आले. सुरुवातीला दुखापत फार गंभीर नसावी असंच सर्वांना वाटलं. मात्र, काही क्षणांतच महिमाच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाला.
“अचानक नाकावर रक्ताची धार लागली. त्याक्षणी मला जाणवलं की काहीतरी मेजर झालंय,” असं महिमाने सांगितलं.
अपघातानंतर महिमाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तिच्या दुखापतीचं गांभीर्य लक्षात आलं. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनाही याची माहिती मिळताच ते रुग्णालयात पोहोचले.
“मला लगेच हॉस्पिटलला नेलं. तेव्हा मला समजलं की खूप लागलंय. मला संपूर्ण माझं आयुष्य डोळ्यासमोर दिसत होतं. माझे सगळे कुटुंबीय हॉस्पिटलला आले,” असं ती म्हणाली.
महिमा दोन-तीन दिवस रुग्णालयात होती. त्यानंतर डॉक्टरांनी तिला विश्रांतीचा सल्ला दिला. काही दिवस ती शूटिंगपासूनही दूर होती.
उपचार सुरू असतानाही महिमाने काम थांबवलं नाही. अपघातानंतर अवघ्या सात-आठ दिवसांनी ती पुन्हा सेटवर परतली.
“अपघात झाल्यावर पुन्हा एकदा उठून उभी राहिले आणि शूटिंगला गेले. सात-आठ दिवसांनी पुन्हा सेटवर गेले आणि शूट सुरू केलं. पट्टी लावून का होईना, मी काम केलं. माझी औषधं सुरू होती, ट्रिटमेंट सुरू होती,” असं महिमाने सांगितलं.
या काळात प्रोडक्शन हाऊसनेही तिला मोठा पाठिंबा दिला. कुटुंबीय, प्रेक्षकांचं प्रेम आणि प्रोडक्शनच्या सहकार्यामुळेच आपण पुन्हा कामावर परतू शकले, असं तिने सांगितलं.
अपघातानंतर महिमाच्या चेहऱ्यावर व्रण झाला होता. हा डाग आणखी गडद होऊ नये आणि त्यावर थेट सूर्यप्रकाश पडू नये, यासाठी ती नाकावर पट्टी लावत होती.
“अपघात झाल्यावर चेहऱ्यावर एक व्रण आला होता. त्यामुळे तो डाग अजून डार्क होऊ नये, तसेच सूर्यप्रकाश त्याला लागू नये यासाठी मी काळजीने ती पट्टी नाकावर लावत होते. जर पट्टी काढली असती, तर गोष्टी अजून बिघडल्या असत्या,” असं महिमाने स्पष्ट केलं.
तब्बल आठ महिने पट्टी लावून शूटिंग करणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. मात्र, प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे तिने हा कठीण काळ धैर्याने पार केला.
शेवटी चाहत्यांचे आभार मानताना महिमा म्हणाली, “हे जितकं सोपं वाटतंय तितकं नक्कीच नव्हतं. तुम्ही मला खरंच सपोर्ट केलात, त्यासाठी मनापासून थँक्यू! तुम्हा सगळ्यांमुळे मला खूप आधार मिळाला.”