
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ मध्ये लवकरच प्रेक्षकांना एक वेगळं आणि विचार करायला लावणारं वळण पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राची लाडकी जोडी अर्जुन–सायली आता एकमेकांच्या भूमिकांमध्ये दिसणार आहे.
ऑफिसच्या कामाप्रमाणेच घरात दिवसभर राबणाऱ्या गृहिणीच्या कष्टांची दखल घेतली जावी, या हेतूने अर्जुन आणि सायली एकमेकांची कामं करण्याचा निर्णय घेतात. सायलीच्या दैनंदिन जबाबदाऱ्या स्वीकारत अर्जुन आता स्वयंपाकघरापासून घरातील सर्व कामांची धुरा सांभाळताना दिसणार आहे. तर सायली अर्जुनच्या भूमिकेत शिरून ऑफिस आणि कोर्टातील कामांची जबाबदारी पार पाडणार आहे.
दोघांसाठीही हा अनुभव नवा असला तरी अनोखी शिकवण देणारा ठरणार आहे. नात्यातील समज, आदर आणि समानतेचं महत्त्व अधोरेखित करणारं मालिकेतलं हे वळण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही. नात्यातील समतोल, परस्पर सन्मान आणि साथ यांचा संदेश देणारं मालिकेतील हे नवं वळण प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लवकरच येऊ घातलेला व्हॅलेण्टाईन डे अर्जुन-सायलीसाठी स्पेशल ठरणार आहे. पहिलं कॉण्ट्रॅक्ट मॅरेज आणि एकमेकांच्या संमतीने झालेलं पहिलं लग्न १४ फेब्रुवारीलाच झालं होतं. त्यामुळे यंदाचा व्हॅलेण्टाईन डे बदलेल्या भूमिकांसोबत ते साजरा करणार आहेत. तेव्हा अर्जुन-सायलीचा हा नवा अंदाज पहायला मिळणार आहे.
आजच्या भागात सायली आणि अर्जुन एकमेकांच्या भूमिकेत वावरताना दिसतात. त्यांच्या या अनोख्या वागण्यामुळे घरच्यांना सुरुवातीला काहीच समजत नाही. अखेर दोघं स्पष्ट करतात की आता “सायली अर्जुन बनली आहे आणि अर्जुन सायली बनला आहे,” म्हणजेच ते एकमेकांची कामं करणार आहेत. दिवसभर सायली जे काही करते. स्वयंपाक, घराची जबाबदारी, सगळ्यांची काळजी,ते सर्व अर्जुन पार पाडणार आहे. तर सायली ऑफिसमध्ये जाऊन अर्जुनच्या केसेस हाताळणार आहे. त्यांच्या या निर्णयाने घरच्यांना नवल वाटतं, मात्र ही कल्पना भन्नाट असल्याचंही सगळे मान्य करतात.