
Tharala tar mag
एकतर अस्मिताच्या घटस्फोटामुळे अर्जुन पुरता चिडलेला आहे. जर मुलाची जबाबदारी स्विकारता येत नाही तर त्यांना जन्म तरी का द्यावा असं म्हणत अर्जुन अस्मिताच्या नवऱ्यावर सचिनवर चिडलेला असतो. अर्जुन सतत हेच म्हणतो की,मी मुल जन्माला घालण्यासाठी आणि एक बाप म्हणून जबाबदारी घेण्यासाठी तयार नाही. या सगळ्यात सायलीला गोड बातमी घरच्यांना सांगताच येत नाही. दरम्यान या सगळ्यावर शुटींग दरम्यान एका मुलाखतीत सायली आणि अर्जुन म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांनी ऑफ कॅमेरा मजेशीर गोष्टी सांगितल्या आहेत.
सुभेदारांच्या घरात तीन तीन मुलं
मालिकेत सध्या साय़ली गरोदर असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता मालिकेने नव्या ट्रॅक पकडला आहे. मुलाखती दरम्यान अमित आणि जुई म्हणाले की, आता अस्मिताचं बाळ, सायलीचं बाळ आणि त्याच पाठोपाठ आता प्रियाचं बाळ देखील सुभेदारांच्या घरात येणार आहे. त्यामुळे आता एक नाही तर तीन तीन बाळ सांभाळायची आहेत. सायलीला बाळ होणार हे कळताच प्रेक्षकांनी कमेंटस बॉक्समध्ये नावं सुचवाय़ला देखील सुरुवात केली आहे. एका युजरने असं म्हटलं की, बाळाचं नाव करण ठेवा. त्यावेळी जुई म्हणाली की, पुढचं पाऊल मालिकेत माझ्या मुलाचं नाव करण होतं. त्यावर अमितने देखील मजेशीर पंच मारला. अमित म्हणाला की, अर्जुनच्या मुलाचं नाव करण कसं ठेवणार? एकंदरितच मालिकेत शुटींगच्या दरम्यान धमाव मजामस्ती सुरु असते.
दरम्यान प्रियाची सध्या जेलमध्ये रवानगी झाली असून जेव्हा अर्जुनला प्रिया सांगते की, तिच्या पोटात अश्विनचं बाळ वाढतंय त्यावेळी अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते. या सगळ्यावर बोलताना सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली की, प्रियाला घराबाहेर काढताना तिचे केस धरुन हाकलून देताना हे कॅमेरामध्ये पाहाताना कितीही छान वाटत असलं तरी, ती तिला मारताना लागणार तिचा त्रास होणार नाही याची काळजी देखील मला तितकीच घ्यावी लागत होती. आता सुभेदारांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होत आहे. त्याचबरोबर सायलीला देखील तिच्या बालपणाच्या काही गोष्टी आठवत आहेत. तिला ज्या पद्धतीने लहानपणीचं सगळं आठवतंय त्यानुसार आता लवकरच सायली तन्वी असल्याचं सत्य समोर येईल असं म्हटलं जात आहे.