
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
झी मराठी कायमच प्रेक्षकांना दर्जेदार आणि मनोरंजक कार्यक्रम देत असते. नुकतीच ‘ सनई चौघडे’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि आठवड्याभरातच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेची कथा लालबाग मध्ये राहणाऱ्या परब कुटुंबाची आहे, ज्यांची स्वामींवर अत्यंत श्रद्धा आणि भक्ती आहे. ह्याचेच औचित्य साधत परब कुटुंब मुंबईहून थेट त्र्यंबकेश्वर येथील ‘श्री स्वामी समर्थ गुरुपीठात’ पोहोचले विश्वविक्रमी श्री स्वामी समर्थ तारकमंत्र पठणासाठी.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर आणि परमपूज्य गुरुमाऊली यांच्या कृपाआशीर्वादाने जवळप्पास ७००० हून अधिक भक्तांसोबत परब कुटुंबाने श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे सामूहिक पठण करत ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’ ला गवसणी घातली आणि स्वामींचे आशीर्वाद घेतले. ही मालिकेतील सर्व कलाकारांसाठी अभिमानाची गोष्ट होती. या भव्य उपक्रमात परब कुटुंबातील पमा, सुभाष आणि त्यांच्या चारही मुलींनी म्हणजेच मेघना एरंडे जोशी, सुहास शिरसाट, चिन्मयी साळवी, श्वेता गायकवाड, जुई गोगरी, रुची नेरुरकर या कलाकारांनी सहभाग दर्शवला होता. या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कलाकारांनी येणाऱ्या भागात मालिकेत घडणाऱ्या घडामोडींबद्दल माहिती दिली आणि आपले स्वामीं बद्दलचे अनुभव शेअर केले.
Prime Video वर ‘मटका किंग’चा वर्ल्डवाइड प्रीमियर; Vijay Varma चा दमदार लूक पाहण्यासाठी व्हा सज्ज
मेघना एरंडे जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “आजचा अनुभव माझ्यासाठी केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर एक अतिशय आध्यात्मिक आणि अंतर्मुख करणारा प्रवास होता. ७ हजारहून अधिक भक्त एकाच सुरात स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करताना पाहणं त्यात सहभागी होणं, हे शब्दांत मांडणं खरंच कठीण आहे. त्या क्षणी एक वेगळीच ऊर्जा आणि समाधान मनात दाटून आलं. अशा पवित्र आणि दिव्य वातावरणाचा भाग होण्याची संधी ‘सनई चौघडे’ आणि झी मराठीमुळे मिळाली, आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे.”
या प्रकारच्या सामूहिक उपक्रमामुळे ‘सनई चौघडे’ मालिकेतील कलाकारांनी फक्त टीव्हीवरच नव्हे, तर वास्तव जीवनातही समाजावर सकारात्मक प्रभाव टाकण्याचे उदाहरण दाखवले आहे.