
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
पावसाळा आणि सण-उत्सवांची चाहूल लागली की छोट्या पडद्यावरील मालिकांमध्येही सणांचे विशेष भाग पाहायला मिळतात. अशातच ‘सनई चौघडे’ मालिकेत यंदाची वटपौर्णिमा खास पद्धतीने साजरी होताना पाहायला मिळणार आहे. मात्र, या आनंदाच्या वातावरणात एक मोठा ट्विस्टही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
मालिकेच्या आगामी भागात जय खानोलकर एका मोठ्या संकटात अडकणार असून, त्या संकटातून त्याची सुटका करण्यासाठी शर्वरी पुढाकार घेणार आहे. त्यामुळे वटपौर्णिमेचा हा विशेष भाग प्रेक्षकांसाठी अधिकच उत्कंठावर्धक ठरणार आहे.
दरम्यान, मालिकेत आसावरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जुई गोगरीने या विशेष भागाच्या चित्रीकरणाचा अनुभव शेअर केला आहे. ती म्हणाली, “पावसाळ्यात शूटिंग करणं खरंच खूप आव्हानात्मक असतं. मी वसईहून ठाण्याला शूटिंगसाठी प्रवास करते. त्यामुळे वाहतूक कोंडी, पाणी साचणं आणि लोकल ट्रेन उशिरा येणं अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सकाळची कॉलटाईम गाठणं हेच मोठं आव्हान असतं.”
ती पुढे म्हणाली, “अडचणी असल्या तरी पावसात शूटिंग करण्याची एक वेगळीच मजा असते. पाऊस पडताना प्रत्येक दृश्य अधिक सुंदर दिसतं. आमच्या वटपौर्णिमेच्या प्रसंगात मी झोपाळ्यावर बसलेली आहे आणि गौतम मला झोका देत आहे. त्यामुळे हा रोमँटिक प्रसंग खूप सुंदर दिसणार आहे.”
जुईने पावसातील शूटिंगमधील तांत्रिक अडचणींबाबतही सांगितलं. “पावसामुळे वायरिंग, इलेक्ट्रिकल उपकरणं, मेकअप, केस आणि वेशभूषा सांभाळणं खूप कठीण होतं. विशेषतः साडी नेसून चिखलात शूटिंग करणं हे मोठं आव्हान असतं. मात्र, आमची संपूर्ण टीम एकमेकांना उत्तम सहकार्य करते. त्यामुळे कोणतीही परिस्थिती असली तरी शूटिंग सुरळीत पार पडलं.”
वटपौर्णिमा, पावसाचं रम्य वातावरण, रोमँटिक क्षण आणि त्याचवेळी जयच्या आयुष्यात येणारं संकट अशा अनेक घडामोडींमुळे ‘सनई चौघडे’ मालिकेचा आगामी भाग प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे.