
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Miss Universe India 2026: ‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२६’ या सौंदर्य स्पर्धेचा भव्य अंतिम सोहळा २३ ऑगस्ट रोजी जयपूरमध्ये पार पडला. देशभरातून आलेल्या ५३ सौंदर्यवतींमध्ये यंदा चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. अखेर केरळची काझिया लिझ मेजो हिने आपल्या नावावर विजेतेपदाची मोहोर उमटवली. आता ती आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
यंदाच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाच सौंदर्यवतींनी धडक मारली होती. यामध्ये तामिळनाडूची वैष्णवी गणेश, महाराष्ट्राची तेजस्विनी श्रीवास्तव, केरळची काझिया लिझ मेजो, गुजरातची अनुश्री सातवलेकर आणि उत्तराखंडची अनुभा वशिष्ठ यांचा समावेश होता.
अंतिम फेरीत स्पर्धकांसमोर ४० सेकंदांत समारोपाचं भाषण करण्याचं आव्हान ठेवण्यात आलं होतं. या फेरीत पाचही अंतिम स्पर्धकांनी भविष्यासाठीची आपली दृष्टी, आयुष्यात आलेली आव्हानं आणि या प्रतिष्ठित मंचापर्यंत पोहोचण्याचा प्रवास याबद्दल मनोगत व्यक्त केलं.
जयपूरच्या ‘पिंक सिटी’मध्ये पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात काझिया लिझ मेजोने आपल्या बुद्धिमत्ता, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर परीक्षकांची मनं जिंकली. ‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२५’ची विजेती मनिका विश्वकर्मा हिने काझियाला विजेतेपदाचा मुकुट प्रदान केला.
निकाल जाहीर झाल्यानंतर केरळच्या काझियाच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकुट चढला. तामिळनाडूची वैष्णवी गणेश प्रथम उपविजेती, तर गुजरातची अनुश्री सातवलेकर द्वितीय उपविजेती ठरली.
या स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तेजस्विनी श्रीवास्तव हिने केलं. तिने अंतिम पाचमध्ये स्थान मिळवत महाराष्ट्राची मान उंचावली. तिच्यासोबत तामिळनाडू, केरळ, गुजरात आणि उत्तराखंडच्या सौंदर्यवतींनीही टॉप-५मध्ये आपली जागा निश्चित केली.
‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२६’चा किताब जिंकल्यानंतर काझिया लिझ मेजो आता आंतरराष्ट्रीय ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. या जागतिक मंचावर भारताची विविधता, संस्कृती आणि नव्या पिढीची ताकद जगासमोर मांडण्याची संधी तिला मिळणार आहे.
विजयानंतर काझियाने हा किताब केवळ उपलब्धी नसून मोठी जबाबदारी असल्याचं म्हटलं. भारताची विविधता, संस्कृती, प्रतिभा आणि नव्या पिढीची शक्ती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचं तिने सांगितलं.
सौंदर्याबरोबरच बुद्धिमत्ता आणि नेतृत्वगुणांवर भर
‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२६’मध्ये केवळ सौंदर्य आणि फॅशनलाच महत्त्व देण्यात आलं नाही. विविध फेऱ्यांमध्ये स्पर्धकांची बुद्धिमत्ता, संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि भारतीय संस्कृतीचं आकलन यांचीही परीक्षा घेण्यात आली.
जयपूरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राजस्थानी संस्कृती आणि आधुनिक भारताचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. फॅशन आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर, परीक्षक आणि फॅशन तज्ज्ञांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली.
‘प्रतिभावान मुलींना व्यासपीठ देणं हा उद्देश’
मिस युनिव्हर्स इंडियाचे आयोजक निखिल आनंद यांनी सांगितलं की, देशातील प्रतिभावान मुलींना आपली क्षमता, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण जगासमोर मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. याच उद्देशाने यंदाचा सोहळा अधिक मोठ्या आणि भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. जयपूरच्या नागरिकांसह स्थानिक प्रशासनाचेही त्यांनी आभार मानले.