
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट एकीकडे बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत नवे विक्रम रचत आहे. या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘देऊळ बंद 2: आता परीक्षा देवाची’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये Top 5 मध्ये स्थान मिळवलं आहे.दुसरीकडे मात्र या चित्रपटावर काही प्रेक्षक आणि टीकाकारांकडून टीका होत आहे. अभिनेते प्रवीण तरडे यांनी अलिकडेच मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत, देऊळ बंद २ चित्रपटाला ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच झापले आहे.
प्रवीण तरडे यांचे सडेतोड उत्तर
तब्बल 11 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर देऊळ बंद २ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मोहन जोशी, स्नेहल तरडे यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकरल्या आहेत. महाराष्ट्रभरात या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळत असला तरी, दुसरीकडे या चित्रपटाला प्रचंड ट्रोल देखील केले जात आहे. नुकतेच प्रवीण तरडे यांनी एका मुलाखतीत, यांना चांगलेच उत्तर दिले आहे. प्रवीण तरडे म्हणाले, ‘ जे देव मानत नाहीत त्यांना हा सिनेमा जास्त झोंबला. माझ्या देवाचा उदो उदो मीच करणार. त्यामुळे मी तो केला. त्याचा कोणाला त्रास झाला याबद्दल मला काही देणंघेणं नाही. उलट मी जास्त आनंदी झालो. म्हणजे ‘तीर निशाने पे लगा है.’ शेतकऱ्यांचा आत्महत्या थांबण्यासाठी माझा देव मैदानात उतरलाय. शेतकरी बनवून तो बांधा बांधावर फिरला. ग्रामीण भागात थेरडा म्हणण्याची पद्धत आहे.पण देवाने तेही हसत हसत स्वीकारलं. कुठल्याही चमत्काराशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवली . मी माझ्या धर्माचं -देवाचं पालन केलं नाही तर फॉरेनवरून कोणी येणार आहे का? त्यामुळे हे ट्रॉलिंग मी मजेने घेतो’ असं प्रवीण तरडे म्हणाले.
Hotel Pithi Bhaat: अभिनेता समीर खांडेकरचं नवं इनिंग, मुंबईत सुरू केलं ‘पिठी भात’ मालवणी रेस्टॉरंट
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 17 व्या दिवशी 1117 शोजमधून 2.60 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईमुळे चित्रपटाचं एकूण भारतातील ग्रॉस कलेक्शन 66.56 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.सध्या चित्रपटाची गती पाहता, रविवारीही जर अशीच चांगली कमाई झाली, तर ‘देऊळ बंद 2’ सहज 70 कोटींचा टप्पा पार करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.भारतातील नेट कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, आतापर्यंत हा आकडा 56.60 कोटी रुपये इतका नोंदवला गेला आहे. त्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवताना दिसत आहे.
‘देऊळ बंद २’ या चित्रपटातून शेतकरी आत्महत्येसारख्या संवेदनशील विषयावर भाष्य करण्यात आले आहे. चित्रपटात मोहन जोशी यांनी श्री स्वामी समर्थ यांची भूमिका साकारली असून प्रसाद ओक, महेश मांजरेकर, मंगेश देसाई आणि ओम भूतकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे, प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या १२ दिवसांत या चित्रपटाने ५० कोटी रुपयांचा गल्ला जमवल्याची माहिती समोर आली आहे.