(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Tukaram Mundhe: अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या चर्चेत आहेत. आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांच्या धडाकेबाज कारवायांचे सत्र सुरू आहे. कडक आणि शिस्तबद्ध प्रशासकीय निर्णयांसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांना आता बॉलिवूडमधूनही पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यांच्या कामाचे सोशल मीडियावरही कौतुक होत आहे.
तुकाराम मुंढे यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत नियमांनुसार आणि कठोरपणे काम केल्याची प्रतिमा आहे. त्यांच्या अनेकदा बदल्या झाल्या आहेत. आता त्यांच्या सध्याच्या बदलीच्या चर्चांदरम्यान ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खास विनंती केली आहे. परेश रावल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री फडणवीस यांना टॅग केले आहे.
परेश रावल यांनी रविवारी, ९ ऑगस्ट रोजी केलेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुकाराम मुंढे यांची सध्याच्या विभागातून बदली किंवा त्यांना पदावरून हटवले जाऊ नये, याची खात्री करण्याचे आवाहन केले.
परेश रावल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तुकाराम मुंढे यांचे संरक्षण करणे आणि त्यांना त्यांच्या विभागात काम करत राहण्याची परवानगी देणे हे मुख्यमंत्र्यांचे प्राधान्य आणि कर्तव्य असायला हवे.
त्यांनी पुढे म्हटले की, अत्यंत नम्रतेने आणि आदराने सांगावेसे वाटते की, तुकाराम मुंढे यांची बदली होऊ न देणे किंवा त्यांना त्यांच्या विभागातून हटवले जाऊ न देणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्राधान्य आणि कर्तव्य असायला हवे.
To put it with humility and respect that it should the priority and Dharm of Honourable CM @Dev_Fadnavis ji to protect Shri @Tukaram_IndIAS that he should not be xfered or shunted out of his department.
🙏🙏🙏 — Paresh Rawal (@SirPareshRawal) August 9, 2026
मे २०२६ मध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळ करणाऱ्यांविरोधात आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली आहे.
मोठ्या रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सपासून उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनपर्यंत विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात आली आहे. दूध आणि पनीरमधील भेसळीबाबतही त्यांनी नागरिकांना सावध केले आहे. त्याचप्रमाणे अॅनालॉग पनीरवर महाराष्ट्रात वर्षभरासाठी बंदी घालण्यात आली आहे.
राज्यातील विविध भागांत भेसळयुक्त पनीर, भेसळयुक्त दूध आणि भेसळयुक्त मिठाईविरोधात कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय हॉटेलमधील निकृष्ट दर्जाचे अन्न आणि गुटखा विक्रीविरोधातही एफडीएकडून धडक कारवाया करण्यात आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा मुद्दा चर्चेत असताना परेश रावल यांनी घेतलेली भूमिका लक्षवेधी ठरली आहे. आता त्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






