
Bangladesh violence against Hind demand to make Priyanka Gandhi as Prime Minister of India
Priyanka Gandhi as PM : नवी दिल्ली : सध्या बांगलादेशमध्ये अराजकता माजली असून हिंसाचार अन् अत्याचार उफाळला आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंना टार्गेट केले जात आहे. हिंदूंना भररस्त्यामध्ये मारहाण केली जात असून जीवंत जाळले जात आहे. या अमानवी हिंसाचाराविरोधात भारतातून आता आवाज उठवला जात आहे. मात्र बांगलादेशमधील हिंदूंसाठी सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बांगलादेशमधील या परिस्थितीवर भाष्य करताना प्रियांका गांधी यांना पंतप्रधान करा अशी मागणी केली जात आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांगलादेशवेळी घेतलेल्या निर्णयाच्या बळावर अशी मागणी केली जात आहे.
बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी प्रियंका गांधी यांना पंतप्रधान बनवण्याची मागणी केली आहे. जर त्यांना पंतप्रधान बनवले गेले तर त्या इंदिरा गांधींप्रमाणेच देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी जोरदार प्रयत्न करतील, असे त्यांनी म्हटले आहे. मसूद यांनी असेही म्हटले आहे की प्रियंका गांधी यांच्या नावात “गांधी” आहे. आणि त्या धडाकेबाज दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नात आहेत. अशा इंदिरा गांधी ज्यांनी पाकिस्तानला इतके नुकसान केले की जखमा अद्याप बऱ्या झालेल्या नाहीत, असा आक्रमक पवित्रा काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी घेतला आहे.
हे देखील वाचा : दोन दशकानंतर महाराष्ट्राचे स्वप्न अखेर पूर्ण होणार! उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा
प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवण्याचा प्रयत्न करा
प्रियंका गांधी गाझावर बोलतात, पण बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांबद्दल एकही शब्द बोलल्या नाहीत, अशा शब्दांत भाजपकडून टीका करण्यात आली. भाजपच्या या आरोपांवर इम्रान मसूद यांनी उत्तर दिले आहे. मसूद म्हणाले की, “प्रियांका गांधी काय आता पंतप्रधान आहेत का? प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवण्याचा प्रयत्न करा आणि इंदिरा गांधींनी पाकिस्तानला दिलेल्या प्रतिसादाप्रमाणे त्या काय उत्तर देतील ते पहा. पण तुमच्यामध्ये असं करण्याची हिम्मत सुद्धा नाही” असा इशारा कॉंग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी भाजपला दिला आहे.
बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्याकांवरील वाढत्या हिंसाचाराची दखल घेण्याचे आवाहन काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी भारत सरकारला केले आहे. बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यात हिंदू तरुण दीपू चंद्र दास यांच्या क्रूर मॉब लिंचिंगनंतर हे आवाहन करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : बांगलादेश हिंसाचाराचे भारतामध्ये पडसाद! बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू तरुण आक्रमक
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये प्रियांका गांधी यांनी लिहिले की, “बांगलादेशमध्ये हिंदू तरुण दीपू चंद्र दास यांच्या क्रूर मॉब लिंचिंगची बातमी अत्यंत चिंताजनक आहे. कोणत्याही सुसंस्कृत समाजात धर्म, जात, ओळख इत्यादींवर आधारित भेदभाव, हिंसाचार आणि हत्या हे मानवतेविरुद्धचे गुन्हे आहेत. भारत सरकारने शेजारील देशात हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्याकांवरील वाढत्या हिंसाचाराची दखल घ्यावी आणि त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा बांगलादेश सरकारसमोर जोरदारपणे उपस्थित करावा.” असे स्पष्ट मत कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले आहे.