
Ethanol statement Janardan Mishra
भोपाळ : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणावरून देशात चर्चा सुरू असतानाच भाजपच्या एका खासदाराच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मध्य प्रदेशातील रिवा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी इथेनॉल मिश्रणाला विरोध करणाऱ्यांवर टीका करताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
कोलकाता-रीवा-भोपाळ विमानसेवेच्या लोकार्पण कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात जनार्दन मिश्रा नागरिकांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी देशातील इंधनाची गरज, कच्च्या तेलाची आयात आणि इथेनॉल मिश्रणाबाबत आपली भूमिका मांडली.
इथेनॉल मिश्रणाच्या मुद्द्यावर बोलताना जनार्दन मिश्रा यांनी भारतातील कच्च्या तेलाच्या उत्पादनाचा आणि आयातीचा संदर्भ दिला. देशाच्या इंधन गरजेपैकी मोठा हिस्सा आयातीवर अवलंबून असल्याचा दावा त्यांनी केला. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, असं सांगत भारताने पर्यायी इंधन स्रोतांचा विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं.
याच मुद्द्यावरून इथेनॉल मिश्रणाला विरोध करणाऱ्यांवर टीका करताना त्यांनी म्हटलं, “देशात शुद्ध पेट्रोल उपलब्धच नाही, तर ते कुठून आणणार? शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरून येईल का?” या वक्तव्यामुळे जनार्दन मिश्रा टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
इथेनॉलचा वापर योग्य असल्याचं सांगताना मिश्रा यांनी ब्राझीलचं उदाहरण दिलं. ब्राझीलमध्ये इथेनॉलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याचा दावा त्यांनी केला.
भारतातील वाहनांमध्येही इथेनॉल मिश्रित इंधन वापरण्याची क्षमता असल्याचं सांगत त्यांनी वाहन उत्पादक कंपन्यांचा हवाला दिला. पेट्रोल आणि डिझेलची आयात कमी करण्यासाठी देशाने पर्यायी इंधनाचा विचार करायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
कार्यक्रमात जनार्दन मिश्रा यांनी भारताच्या आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रातील प्रगतीचाही उल्लेख केला. देशात रोजगाराच्या संधी वाढत असून भारत आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसंच संरक्षण साहित्याच्या निर्यातीचा उल्लेख करत भारताची जागतिक पातळीवरील क्षमता वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं.
होर्मुझ संकटातही इंधनटंचाई नाही; पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा दावा
दरम्यान, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा मुद्दा गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. इथेनॉलमुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो का, इंधनाच्या किंमतीवर त्याचा काय परिणाम होतो आणि शेतकऱ्यांसाठी त्याचे काय फायदे आहेत, यावर विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांच्या वक्तव्यामुळे इथेनॉलचा मुद्दा पुन्हा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.