
Dharmendra Pradhan
NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात मोठं आंदोलन झाल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मुद्दा चर्चेत आला. विद्यार्थ्यांकडून आणि विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांनी पहिल्यांदाच या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे.
भुवनेश्वर येथील जीएम विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनाम्याबाबत भूमिका स्पष्ट केली. “युवा पिढीची दिशाभूल करण्यात आली. देश आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन मी राजीनामा दिला,” असं त्यांनी म्हटलं.
धर्मेंद्र प्रधान यांनी काही लोकांकडून युवा पिढीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला. भारतात दरवर्षी मोठ्या संख्येने मुलांचा जन्म होतो आणि त्यांच्या भविष्यासाठी अनेक अपेक्षा असल्याचं त्यांनी नमूद केलं. “माझ्यासाठी पद महत्त्वाचं नाही,” असं सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याला आणि देशाच्या हिताला प्राधान्य असल्याचं स्पष्ट केलं.
कार्यक्रमादरम्यान बाहेर काही बीजेडी कार्यकर्त्यांकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यावर प्रतिक्रिया देताना या घोषणाबाजीमुळे आपण अजिबात त्रस्त नसल्याचं त्यांनी सांगितलं.
आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत धर्मेंद्र प्रधान यांनी आपण शेतकऱ्याचा मुलगा असल्याचं सांगितलं. “मला परत जाण्यास सांगितलं तरीही मी परत जाणार नाही. मी परत येईन,” असं वक्तव्य त्यांनी केलं.
NEET पेपरफुटीप्रकरणी देशभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. शिक्षणमंत्री म्हणून धर्मेंद्र प्रधान यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. आंदोलकांनी सरकारशी चर्चा करण्याची तयारी दाखवली असली तरी राजीनामा होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतल्याचं या प्रकरणाच्या राजकीय चर्चेत सांगितलं जात होतं.
Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या ताफ्यात अचानक गोंधळ! कारवर दगडफेक, ‘चोर-चोर’च्या घोषणा
धर्मेंद्र प्रधान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. ओडिशातील भाजपचा प्रमुख ओबीसी चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. केंद्रीय मंत्रिमंडळात दीर्घकाळ महत्त्वाची जबाबदारी सांभाळलेल्या प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली. NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सरकारवर वाढलेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या या पहिल्या वक्तव्यामुळे NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.