
लोकसभा निवडणुकांचे काल निकाल समोर आले. या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले. याचदरम्यान आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली. एनडीए तिसऱ्यांदा सत्तेवर येणार आहे. यासाठी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळही निश्चित करण्यात आली आहे. 8 जून रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यासंदर्भातील नव्या मंत्रिमंडळातील चेहऱ्यांबाबत मित्रपक्षांशी चर्चा आणि बैठकींचे सत्र सुरु आहेत. या दोन-तीन दिवसांत नावे निश्चित होण्याची शक्यता आहे.
तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच नरेंद्र मोदींच्या नावावर एक नवा विक्रम होणार आहे. सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून देशाचे पंतप्रधान होणारे ते देशातील दुसरे नेते बनतील. यापूर्वी हा विक्रम जवाहरलाल नेहरूंच्या नावावर होता. मोदी त्यांच्या विक्रमाची बरोबरी करतील.
एनडीएची आज दुपारी 4 वाजता बैठक
आज दुपारी ४ वाजता दिल्लीत एनडीएची बैठक होणार आहे. या बैठकीत जेडीयू प्रमुख नितीश कुमार, टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आणि इतर नेते सहभागी होणार आहेत. एनडीएच्या मित्रपक्षांशी चर्चेनंतर भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये सरकार स्थापनेची रुपरेषा आणि शपथविधी यावर चर्चा होणार आहे. जेडीयू प्रमुख नितीश कुमार बुधवारी सकाळी दिल्लीत पोहोचले. चंद्राबाबू नायडूही दुपारपर्यंत दिल्लीला पोहोचू शकतात.
2019 मध्ये काय होती परिस्थिती
2019 च्या निकालानंतर 7 दिवसांनी पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा पार पडला होता. 2014 मध्ये जेव्हा NDA सरकार स्थापन झाले तेव्हा 10 दिवसांनी मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी निकाल जाहीर झाल्यानंतर ४ दिवसांनी म्हणजे ८ जून रोजी शपथविधीची होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एनडीएला बहुमत मिळाले
लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी आले. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने 292 जागा जिंकून बहुमत मिळवले. विरोधी आघाडीच्या इंडिया ब्लॉकला 234 जागा मिळाल्या आहेत. एकट्या भाजपने 240 जागा जिंकल्या आहेत. अशा स्थितीत ते बहुमताच्या (272) अंकाच्या खूप मागे आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली 282 जागा जिंकल्या आणि 2019 च्या निवडणुकीत 303 जागा जिंकून स्वबळावर बहुमत मिळवले. मात्र, यावेळी मित्रपक्षांना सामावून घेत एनडीएला बहुमत मिळवण्यात यश आले आहे.
17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जूनला संपणार
याआधी पंतप्रधानांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर संभाव्य सरकार स्थापनेबाबत चर्चा केली. सकाळी 11.30 वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक सुरू झाली आणि त्यानंतर मंत्रिपरिषदेची बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मोदी 2.0 च्या कॅबिनेट आणि मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक होती. मंत्रिमंडळ सध्याची लोकसभा विसर्जित करण्याची शिफारसही करू शकते. सध्याच्या 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत आहे.