ऐन लग्नाच्या दिवशी नवरदेव बेपत्ता झाल्याची घटना उत्तराखंडमधून उघडकीस आली आहे. लग्नाच्या दिवशी कपडे खरेदी करण्यासाठी निघालेला तरुण संध्याकाळपर्यंत घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या बेपत्ता (Groom Missing From Marraige) होण्याची तक्रार पोलिसात दिली. कुटुंबीय आणि नातेवाईक तरुणाच्या शोध घेत असून, वधू पक्षाला याची माहिती मिळताच त्यांनी संताप व्यक्त करत लग्न करण्यास नकार दिला.
[read_also content=”1993 मधील ‘देख भाई देख’ टीव्हीवर पुन्हा सुरू होणार? मालिकेच्या दुसऱ्या भागाबद्दल शेखर सुमननं दिली माहिती https://www.navarashtra.com/movies/shekhar-suman-shares-major-update-about-the-return-of-the-iconic-show-dekh-bhai-dekh-nrps-529947.html”]
विजयनगर येथे राहणाऱ्या तरुणाचे एका मुलीसोबत लग्न जुळलं होतं. शनिवारी दुपारी 12 वाजता त्याच्या लग्नाची वरात निघणार होती. दोन्ही कुटुंबात लग्नाची तयारी जोरात सुरू होती. शनिवारी सकाळी बाजारातून शेरवानी घेण्यासाठी तरुणाने आईकडून 15 हजार रुपये घेतले.
सकाळी साडेआठच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला. मात्र, दोन तास उलटूनही तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. त्याचा मोबाईलही बंद होऊ लागला. कुटुंबीय व नातेवाइकांनी शक्य त्या ठिकाणी त्याचा शोध घेतला, मात्र सायंकाळपर्यंत त्याची माहिती मिळू शकली नाही. कुटुंबीयांनी रामनगर येथील वधूपक्षाशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली.
लग्नाची वरात न आल्याने वधूपक्षाची सर्व तयारी ठप्प झाली होती. यामुळे संतापलेल्या वधूपक्षाच्या लोकांनी लग्नास नकार दिला. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वादाची परिस्थिती निर्माण झाली असून तरुणाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आहे.
त्याच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण लग्न जुळल्यामुळे आनंदी दिसत होता. तो कुठल्याच तणावात नव्हता. तो कसा आणि का बेपत्ता झाला हे कोणालाच माहीत नाही. मात्र, तरुण बेपत्ता झाल्याने लग्नघरात शोककळा पसरली होती. लग्नाला उपस्थित राहण्यासाठी सर्व नातेवाईक खूप उत्सुक होते. सगळ्यांनी लग्नाला जाण्याची तयारी केली होती. मात्र, सगळ्यांच्या आनंदावर विरजण पडलं आहे.






