सौजन्य : सोशल मीडिया
नवी दिल्ली : सध्या देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या पावसाने (Rain News) दमदार हजेरी लावली आहे. त्यातच आता हवामान विभागाने देशातील 12 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामध्ये बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, केरळ, कर्नाटक आणि तेलंगणा यांचा समावेश आहे.
मान्सूनही अपेक्षित वेळेच्या 4 दिवस आधी गुजरातमध्ये दाखल झाला आहे. बुधवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. याशिवाय मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये हलक्या पावसाची बातमी आहे. दुसरीकडे, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे. हवामान खात्याने उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, ओडिशा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यांतील अनेक शहरांमध्ये मंगळवारी (दि.11) तापमान 40 सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले. उत्तर प्रदेशातील प्रयागराज सलग दुसऱ्या दिवशी देशातील सर्वाधिक उष्ण राहिले. येथील तापमान 47 अंशांच्या वर नोंदवले गेले. 10 जून रोजी येथील तापमान 46.3 अंश होते.






