ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १० सदस्याचा खात्मा (फोटो सौजन्य-X)
Operation Sindoor News in Marathi : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील १० सदस्य ठार झाले आहेत. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याने स्वतः याची पुष्टी केली आणि सांगितले की, भारतीय हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील १० सदस्य आणि चार जवळचे सहकारी मारले गेले आहेत.
या हल्ल्यानंतर, दुःखी मसूद अझहर म्हणाला की या हल्ल्यात मीही मारला गेला असता तर बरे झाले असते. जैश-ए-मोहम्मदने एका निवेदनात म्हटले आहे की, “मौलाना कशफ यांचे संपूर्ण कुटुंब, मौलाना मसूद अझहर यांच्या मोठ्या बहिणीसह मारले गेले आहे आणि मुफ्ती अब्दुल रौफ यांचे नातवंडे, बाजी सादिया यांचे पती आणि त्यांच्या मोठ्या मुलीची चार मुले जखमी झाली आहेत. बहुतेक महिला आणि मुले मारली गेली आहेत.” हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अझहरच्या कुटुंबातील सदस्यांना आणि जवळच्या व्यक्तींना आज दफन करण्यात येईल.
काल रात्री उशिरा भारतीय सशस्त्र दलांनी पंजाबमधील जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला असलेल्या वहावलपूरसह नऊ दहशतवादी अड्ड्यांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ला केला. पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, ‘भारताची कारवाई केंद्रित, मोजमापित आणि चिथावणीखोर नव्हती.’ ते म्हणाले की, पहलगाम हल्ला अत्यंत क्रूर होता.
यावेळी कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, भारतीय सशस्त्र दलांनी ६-७ मे २०२५ च्या रात्री १.०५ ते १.३० दरम्यान ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते म्हणाले, “२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ही कारवाई सुरू करण्यात आली होती. या कारवाईत लष्करी तळांना किंवा सामान्य लोकांना लक्ष्य करण्यात आले नाही. नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आणि ते पूर्णपणे नष्ट करण्यात आले.” तत्पूर्वी, संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते आणि निर्देशित केले जात होते. एकूण नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.”, अशी माहिती देण्यात आली.