
'राहुल गांधी नव्हे, मोदींनी वांगचुक यांची भेट का घेतली नाही?' हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे मुद्दे व काँग्रेस पक्षाचे मुद्दे सारखेच असून काँग्रेस पक्षाने वांगचुक यांच्या आधीपासूनच नीट परीक्षेचा मुद्दा हाती घेत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दोघांचा लढा एकाच मुद्द्यासाठी, त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांची भेट का घेतली नाही, यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वांगचुक यांची अद्याप भेट का घेतली नाही? शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला नाही? हा आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, “सोनम वांगचुक यांनी याआधी लडाखच्या प्रश्नावरही उपोषण केले होते पण भाजपा सरकारने त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करुन जेलमध्ये टाकले होते. मागील २० दिवसापासून त्यांचे नीट पेपर फुटी प्रश्नी उपोषण सुरु आहे पण भाजपा सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतलेली नाही.”
‘राज ठाकरेंना ढेकळं कळतात का?’ गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; सोनम वांगचुक आंदोलनावरूनही केली टीका
“नरेंद्र मोदी यांनी या विषयावर ‘मन की बात’ सुद्धा केलेली नाही पण काँग्रेसला मात्र वांगचुक यांच्याशी जोडून पाहिले जात आहे ते चुकीचे आहे. मोदी सरकारने नीट पेपर फुटीचा मुद्दा गांभीर्याने घेतलेला नाही. २४ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरु आहे, म्हणूनच राहुल गांधी यांनी ‘छात्रों की गुंज’ हे देशव्यापी अभियान सुरु केले आहे आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, ही मागणी लावून धरली आहे,” असेही सपकाळ म्हणाले.
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या रामरक्षा कार्यक्रमाचे मुख्यमंत्री व मोहन भागवत यांना आमंत्रण देण्यात आले आहे, या प्रश्नावर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “राम नाम जपना, पराया माल अपना’, हे भाजपा व रा. स्व. संघाचे वर्तन आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरात मोठी चोरी झाली, हे चोर भाजपा व रा. स्व. संघाशी संबंधित आहेत. त्या लोकांना नरेंद्र मोदी सरकारनेच नियुक्त केले होते. श्रीराम मंदिरात मोठी चोरी झाली, त्यासाठी एसआयटी नेमली पण ही एसआयटी हीच भाजपा सरकारच्या ताटाखालचे मांजर आहे ते खऱ्या चोरांना काय पकडणार? भाजपा / RSS या चोरीवर मूग मिळून गप्प आहे.”
“शिवसेनेने रामरक्षा कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे, हिम्मत असेल तर मुख्यमंत्री व सरसंघचालक मोहन भागवत यांनी रामरक्षा कार्यक्रमाला जावे,” असेही सपकाळ म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “यासंदर्भात मागील काही दिवसापासून मीडियातून चर्चा सुरु आहेत पण त्यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्यावर विश्वास ठेवला पाहिजे,” असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.