
‘मी बाबा बागेश्वर नाही...’, IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना PM मोदींचा मिश्कील अंदाज
दीक्षांत समारंभात बोलताना नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या मनात भविष्याबाबत सुरू असलेल्या विचारांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, आज सर्व विद्यार्थी दीक्षांत समारंभासाठी येथे उपस्थित आहेत; मात्र त्यांच्या मनात भविष्यासंदर्भात अनेक विचार सुरू असतील. यावेळी मिश्कीलपणे ते म्हणाले, “मी बाबा बागेश्वर तर नाही, पण काहीतरी चाललं असेल.” मोदी यांच्या या वक्तव्यावर विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात भविष्याची वेगवेगळी चित्रे असतील, असेही त्यांनी सांगितले. काही विद्यार्थ्यांना पहिली नोकरी आणि पहिल्या पगाराची उत्सुकता असेल, तर काही जण स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असतील. काही विद्यार्थ्यांचे पुढील स्पर्धा परीक्षांचे लक्ष्य असेल. प्रत्येकाचे स्वप्न आणि ध्येय वेगळे असले तरी आजच्या दिवसाचा उत्साह सर्वांच्या मनात समान असल्याचे मोदी म्हणाले.
मोदी यांनी विद्यार्थ्यांना IIT दिल्लीतील त्यांच्या पहिल्या दिवसाची आठवण करून दिली. कालच ओरिएंटेशन कार्यक्रम झाला आणि पाहता पाहता दीक्षांत समारंभाचा दिवस आला, असे वाटत असेल, असे ते म्हणाले. आजपासून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे, असे सांगत त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदी यांनी तंत्रज्ञानामुळे जगात वेगाने होत असलेल्या बदलांवरही भाष्य केले. जागतिक व्यवस्थेत वेगाने बदल होत असून त्यामागे तंत्रज्ञान हा महत्त्वाचा घटक आहे, असे त्यांनी सांगितले. पुढील 20 ते 30 वर्षांत जगाचे स्वरूप कसे असेल, याचा अचूक अंदाज बांधणे कठीण आहे. तंत्रज्ञान बदलेल, जग बदलेल; मात्र या बदलत्या जगात जो सातत्याने शिकत राहील, तोच पुढे जाईल, असा संदेश मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
IIT दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना मोदी यांनी पदक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मात्र यामध्ये विद्यार्थिनींची संख्या आणखी वाढायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. “काही विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीसाठी पदक मिळाले आहेत. मी तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. मात्र यात आणखी काही मुली असत्या तर आणखी चांगले झाले असते. फक्त एक-दोनच का? आणखी असायला हव्यात,” असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढीच्या संघर्षाचीही आठवण करून दिली. प्रत्येक पिढीसमोर एक विशिष्ट राष्ट्रीय कर्तव्य असते, असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला गुलामगिरीतून मुक्त करणे हे त्या पिढीसमोरील सर्वात मोठे ध्येय होते. त्यासाठी असंख्य लोकांनी दीर्घकाळ संघर्ष केला, त्याग केला आणि बलिदान दिले. आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, त्यामागे त्या पिढीचा संघर्ष आणि त्याग आहे, असे मोदी यांनी नमूद केले.
आजच्या पिढीसमोरील आव्हाने वेगळी असल्याने तिची जबाबदारीही वेगळी आहे, असे मोदी म्हणाले. विद्यार्थ्यांनी पुढील 30 ते 35 वर्षे जे काम केले, त्याचा विकसित भारताच्या प्रवासावर परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रत्येक निर्णय घेताना “यामुळे देशाला काय फायदा होईल आणि देशाची कोणती गरज पूर्ण होईल?” याचा विचार करण्याचे आवाहन मोदी यांनी IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांना केले.
एकूणच, IIT दिल्लीच्या दीक्षांत समारंभात नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना केवळ करिअरच्या दृष्टीने नव्हे, तर देशाच्या भविष्यातील योगदानाच्या दृष्टीनेही विचार करण्याचा संदेश दिला. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात सतत शिकत राहणे, स्वतःची स्वप्ने पूर्ण करणे आणि त्याचवेळी विकसित भारताच्या निर्मितीत योगदान देणे, हीच पुढील पिढीची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोदी-शहा भेटीमागचं खरं कारण काय? सुनील तटकरेंचा मोठा खुलासा, राजकीय भेटींमुळे तर्कवितर्कांना उधाण