
लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान (Photo Credit- X)
लोकसंख्येच्या मुद्द्यावर बोलताना मोहन भागवत म्हणाले की, “हिंदू समाजाने कुटुंब विस्ताराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. लोकसंख्येचे संतुलन बिघडणे भविष्यासाठी घातक ठरू शकते, त्यामुळे तरुणांनी विवाहांतर किमान तीन मुलांच्या पालकत्वाचा विचार करावा.” तसेच, ‘घरवापसी’च्या मुद्द्यावर त्यांनी स्पष्ट केले की, ही कोणतीही तात्काळ प्रक्रिया नसून सामाजिक संवाद आणि सामंजस्यातून हळूहळू होणारी प्रक्रिया आहे.
सामाजिक सलोख्यावर भर देताना सरसंघचालकांनी मुस्लिमांबाबत मोठे विधान केले. “भारतात राहणाऱ्या मुस्लिमांची मुळे याच भूमीशी जोडलेली आहेत. ते येथीलच पूर्वजांची संतान आहेत. त्यामुळे समाजाला विभागण्याऐवजी जोडण्याची आज खरी गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले. मुस्लिम राष्ट्रीय मंचबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, काही मुस्लिमांनी स्वतःहून संघाशी जोडले जाण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यातूनच या मंचाची स्थापना झाली.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) नियमांवरून सुरू असलेल्या वादावर भागवत यांनी सरकारची बाजू सावरली. “सरकारने बनवलेले नियम कोणत्याही विशिष्ट वर्गाच्या विरोधात नसतात. कायद्याचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कोणाला आक्षेप असल्यास त्यांनी घटनात्मक मार्गाने आपली बाजू मांडावी, कारण हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे,” असे त्यांनी सांगितले.
जातिव्यवस्थेवर चिंता व्यक्त करताना भागवत यांनी एक मार्मिक उदाहरण दिले. ते म्हणाले, “जर एखादी व्यक्ती खड्ड्यात पडली असेल, तर त्याला बाहेर काढण्यासाठी बाहेरच्या व्यक्तीला झुकावे लागेल आणि खड्ड्यातील व्यक्तीलाही हात वर करावा लागेल. म्हणजेच, सामाजिक समरसता ही दोन्ही बाजूंच्या सहकार्यानेच शक्य आहे.” जातीपातीचे राजकारण आणि भेदभाव विसरून समाज म्हणून एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुघल आणि इंग्रजांच्या प्रदीर्घ राजवटीतही भारतीय संस्कृती आणि सनातन परंपरा अबाधित राहिली, याचा दाखला देत त्यांनी हिंदू समाजात आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न केला. “अनेक आक्रमणे झेलूनही आपली संस्कृती भक्कम आहे, त्यामुळे आजच्या समाजाने पूर्ण आत्मविश्वासाने प्रगतीपथावर पुढे जायला हवे,” असे ते म्हणाले.
Mohan Bhagwat News: ‘संघाने सांगावे राजीनामा देतो!’ ७५ वर्षे वयोमानावर मोहन भागवत यांचे मोठे विधान