
Thalapathy Vijay, TVK, Tamil Nadu Politics, Governor vs Government,
दरम्यान टिव्हीके पक्षाला काँग्रेसच्या ५ आमदारांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. मात्र टिव्हीकेला बहुमत सिद्ध करण्यासाठी अजूनही पाच आमदारांची गरज आहे. हाच धागा पकडून, ‘आधी 118 आमदारांच्या सह्या घेऊन या, त्यानंतरच शपथ घ्या,’ अशी भूमिका राज्यपालांनी घेतली आहे. राज्यपालांच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे विजय थलपती यांचा आजचा शपथविधी रद्द करण्यात आला आहे. राज्यपालांच्या या भूमिकेवरून राजभवनाच्या आडून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे आमदार फुटण्याच्या भीतीमुळे अण्णा द्रमुकने आपल्या आमदारांना पुद्दुचेरीच्या रिसॉर्टमध्ये पाठवले आहे. त्यामुळे तामिळनाडूचा सत्तासंघर्ष कोणत्या वळणावर जातो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राप्रमाणेच आता तामिळनाडूतही ‘राज्यपाल विरुद्ध राज्यकर्ते’ असा संघर्ष पाहायला मिळत आहे. अभिनेता-राजकारणी विजय यांच्या टीव्हीके पक्षाने सरकार स्थापनेसाठी दावा केला असला, तरी आवश्यक बहुमत नसल्याचे सांगत राज्यपाल आर. एन. आर्लेकर यांनी अद्याप शपथविधीला परवानगी दिलेली नाही.
विजय थलपती यांनी बुधवारी (6 मे) ११३ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन राजभवनात राज्यपालांची भेट घेतली होती. मात्र, विधानसभेतील बहुमतासाठी आवश्यक असलेला ११८ चा आकडा पूर्ण होत नसल्याचे सांगत राज्यपालांनी त्यांना परत पाठवले. त्यानंतर गुरुवारी (7 मे) विजय यांनी पुन्हा राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. मात्र, यावेळीही राज्यपालांनी टीव्हीकेकडे बहुमतासाठी लागणारे आवश्यक संख्याबळ नसल्याचे सांगत, ११८ आमदारांच्या सह्यांसह लेखी पाठिंबा सादर करण्याचे निर्देश दिले.
सरकार स्थापन झाल्यानंतर ते स्थिर राहावे आणि लगेच कोसळू नये, यासाठी स्पष्ट बहुमत आवश्यक असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. तसेच, अन्य कोणत्याही पक्षाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्यात येणार नसल्याचे आश्वासनही त्यांनी विजय यांना दिल्याची माहिती आहे.
दरम्यान, राज्यपालांच्या भूमिकेवरून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप तामिळनाडूच्या राजकारणात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. काँग्रेसने राज्यपालांवर टीका करत, “तमिळ जनतेने स्पष्ट जनादेश दिला असताना राज्यपाल अडथळे निर्माण करत आहेत,” असा आरोप केला. मक्कल निधी मय्यम पक्षाचे प्रमुख आणि अभिनेते कमल हासन यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, “टीव्हीकेने १०८ जागांवर विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत विजय यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित न करणे म्हणजे जनादेशाचा अपमान आहे,” असे म्हटले आहे.
सध्या टीव्हीकेकडे १०८ जागा आहेत. विजय थलपती यांनी जिंकलेल्या दोन जागांपैकी एक जागा रिक्त करणार असल्याने पक्षाची संख्या १०७ वर येणार आहे. काँग्रेसच्या पाच आमदारांचा पाठिंबा गृहित धरला, तरी टीव्हीकेची संख्या ११२ पर्यंतच पोहोचते. त्यामुळे बहुमतासाठी अजून सहा आमदारांची आवश्यकता आहे.
यामुळे टीव्हीकेसमोर अण्णाद्रमुक किंवा द्रमुकचा पाठिंबा मिळवण्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. अण्णाद्रमुकच्या काही आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा द्यावा, अशी मागणी पक्षांतर्गत होत असल्याची चर्चा आहे. मात्र, अण्णाद्रमुकने अधिकृतरीत्या याचा इन्कार केला आहे. दरम्यान, फोडाफोडीच्या भीतीने अण्णाद्रमुकने आपल्या २५ आमदारांना पुदुच्चेरीतील रिसॉर्टमध्ये हलवल्याची माहिती समोर आली आहे.
5 States Assembly Election: भारताच्या राजकीय नकाशातून डाव्यांचा ‘अस्त’
दुसरीकडे, अण्णाद्रमुक आणि द्रमुक यांच्यात सत्तास्थापनेसाठी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. मात्र, दोन्ही पक्षांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ९ मे रोजी संपत असल्याने राज्यपालांकडे निर्णय घेण्यासाठी मर्यादित वेळ उरला आहे. भारतीय संविधानाच्या कलम १६४(१) नुसार मुख्यमंत्री नियुक्त करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. त्रिशंकू विधानसभा निर्माण झाल्यास योग्य उमेदवार निवडण्याचे स्वातंत्र्यही राज्यपालांना आहे. यापूर्वी अनेक राज्यांमध्ये सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला अल्पमत सरकार स्थापनेची संधी देण्यात आलेली आहे.