
Good News ! नवजात बालकांना आता सरकार देणार सोन्याची अंगठी; निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता
चेन्नई : आत्तापर्यंत आपण निवडणुकीच्या काळात अनेक आश्वासने ऐकली असतील. मात्र, काही आश्वासनांची पूर्तता होते. तर अनेक आश्वासने ही आश्वासनेच राहतात. पण, तामिळनाडू सरकार याला अपवाद ठरताना दिसत आहे. कारण, मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांचे सरकार आता नवजात बालकांना सोन्याची अंगठी देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
‘थाई मामन गोल्ड रिंग योजना’ (नवजात बालकांसाठी एक ग्रॅम सोन्याची अंगठी) योजनेची अंमलबजावणी, देखरेख आणि व्यवस्थापनासाठी तामिळनाडू सरकार ‘राज्य प्रकल्प कार्यक्रम व्यवस्थापन युनिट’ स्थापन करणार आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयामध्ये जन्मलेल्या प्रत्येक नवजात बालकाला आजच्या दरानुसार १३,६०० रुपये किमतीची सोन्याची अंगठी मिळणार आहे.
‘थायम्मन सीर’ (मामाकडून भेट) नावाच्या सांस्कृतिक परंपरेचा भाग म्हणून नवजात बालकाच्या स्वागतासाठी आणि कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी ही अंगठी दिली जाईल. थिममन थंगा मोतिरम थिट्टम योजनेअंतर्गत सरकारी वैद्यकीय संस्थामध्ये जन्मलेल्या मुलांसाठी एक ग्रॅम सोन्याची अंगठी ही प्रसूतीचा आनंद आणि मातृत्वाचे महत्व साजरे करते. त्यामुळे ही अंगठी कौतुक आणि स्मरणाचे प्रतीक आहे. माजी मुख्यमंत्री सी. एन. आण्णादुराई यांच्या जयंतीदिनी, 15 सप्टेंबर रोजी विजय या योजनेचा शुभारंभ करतील.
राज्य सरकारी आदेशात म्हटले आहे की, या योजनेद्वारे सरकार आपल्या संस्थांमध्ये जन्मलेला प्रत्येक बालकासाठी मामाची भूमिका बजावेल आणि स्वागत म्हणून सोन्याची अंगठी भेट देईल. २३ एप्रिलच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विजय यांनी राज्यात जन्मलेल्या प्रत्येक बालकाला मामा म्हणून सोन्याची अंगठी भेट देण्याचे वचन दिले होते. त्यानुसार, आता ही वचनपूर्ती होताना दिसत आहे.
शिक्षणासाठी सरकारकडून दरमहा २२५० रुपये मदत
मुंबई विभागातील सर्व भागामध्ये क्रांतिज्योती सावित्रिबाई फुले योजनेअंतंर्गत एकल माता असणाऱ्या २६७७७ विद्यार्थांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. सदर योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य तसेच शिक्षण महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत शिक्षण उपसंचालकांनी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमधील शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश देऊन ही योजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.