नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरू यांच्यावर केलेल्या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी समाचार घेत त्यांच्या भाषणाची चिरफाड केली आहे. पंतप्रधान देशाचा असतो, तो एका पक्षाचा नसतो असे सांगत खडे बोल सुनावले. शरद पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नरेंद्र मोदींनी (PM Modi) चुकीची व्यवस्था स्वीकारली असल्याचा घणाघात केला.
मोदींच्या भाषणात समाजात एकता
लोकशाहीमध्ये अधिकार महत्त्वाचे असतात, चुकीला चूक म्हणता आले पाहिजे. चुकीचा कार्यक्रम असो, चुकीचे काम असो.. चुकीला विरोध केला पाहिजे. मी आता एक तास पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकले, त्यामध्ये मोदींच्या भाषणात समाजात एकता निर्माण व्हावी यासाठी काही नव्हते. मोदींच्या भाषणात विनोद (sarcastically बोलत) होते, अशा शब्दांत शरद पवार यांनी मोदींच्या भाषणाची चिरफाड केली.
नेहरूंनी देशाचा चेहरा बदलण्याचे काम केले
पीएम मोदींच्या भाषणाचा समाचार घेताना शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान देशाचे असतात. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान होते. नेहरूंनी देशाचा चेहरा बदलण्याचे काम केले. त्यावेळी जवाहरलाल नेहरू आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. दिवंगत नेत्यांवर टीका योग्य नसल्याचे खडे बोल शरद पवार यांनी पीएम मोदींना सुनावले. मोदींचे भाषण ऐकून दु:ख झालं असल्याचे त्यांनी सांगितले. इंदिरा गांधी असो, जवाहरलाल नेहरू यांचे प्रत्येकाचे देशासाठी विकासात योगदान आहे. नरेंद्र मोदींनी चुकीची व्यवस्था स्वीकारली आहे.
धर्मांध शक्तींविरोधात संघटन तयार करावे लागेल
ते पुढे म्हणाले की, विद्यापीठांमध्ये धार्मिक धुव्रीकरणाचा वर्ग तयार केला जात असल्याचे आपण पाहत आहोत. याची सुरुवात दिल्ली विद्यापीठात झाली. आता दिल्लीपर्यंत हे मर्यादित राहिलं नसून पुणे असो किंवा मुंबई असो याठिकाणी या घटना घडत आहेत. या धर्मांध शक्तींविरोधात एक जबरदस्त संघटन आपल्याला तयार करावं लागेल. जे सुरू आहे ते अतिशय वाईट सुरु असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सरकारी यंत्रणांचा गैरवापर
सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याची टीका शरद पवार यांनी केली. यावेळी त्यांनी झारखंडमधील मुख्यमंत्री जे एक वेगळी भूमिका घेत होते, त्यांचे उदाहरण दिले. सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जातो आहे. असहिष्णुता वाढली असून आपल्याला एकत्र येऊन संघर्ष करावा लागेल बेरोजगारी वाढली असल्याने वैफल्यग्रस्त लोकांची संख्या वाढत आहे. या मुद्द्यावर काम करावं लागेल, असेही त्यांनी सांगितले.