
‘अंतिम पग’च्या निनादात देशसेवेची नवी शपथ
३५३ छात्रांची राष्ट्ररक्षणासाठी पुढील वाटचाल
१५०व्या तुकडीचे दिमाखदार दीक्षांत संचलन
पुणे/सुनयना सोनवणे: खेत्रपाल मैदानावर शनिवारी (ता. ३०) शौर्य, शिस्त आणि अभिमानाचा अविस्मरणीय सोहळा रंगला. ‘कदम कदम बढाये जा’, ‘सारे जहाँ से अच्छा’ आणि ‘हम एनडीए के कॅडेट हैं’च्या जोशपूर्ण सुरावटींनी (Indian Army) परिसर दुमदुमून गेला असताना ताठ मानेने आणि आत्मविश्वासाने आगेकूच करणाऱ्या पांढऱ्या शुभ्र गणवेशातील छात्रांच्या पावलांनी मैदान भारावून गेले. तीन वर्षांच्या कठोर प्रशिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) ऐतिहासिक १५०व्या तुकडीतील ३५३ छात्रांनी ‘अंतिम पग’ पार करत देशसेवेच्या नव्या पर्वात प्रवेश केला.
भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या प्रमुख उपस्थितीत खडकवासला येथील अरुण खेत्रपाल मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल संदीप जैन, एनडीएचे कमांडंट व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी, डेप्युटी कमांडंट आणि मुख्य प्रशिक्षक एअर व्हाइस मार्शल राजेश वर्मा यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि छात्रांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनरल द्विवेदी यांनी संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली.
१५०व्या तुकडीतील ३५३ छात्रांमध्ये १८ महिला छात्र आणि १२ मित्र राष्ट्रांतील २४ विदेशी छात्रांचा समावेश होता. परेडचे नेतृत्व अकादमी कॅडेट कॅप्टन मयंक चौधरी यांनी केले, तर लेफ्टनंट कर्नल अविनाश पांडे यांनी ‘रिलायंट रॉबिन’ या घोड्यावर स्वार होऊन संचलनाचे संचालन केले.
छात्रांना मार्गदर्शन करताना जनरल द्विवेदी म्हणाले, दृष्टिकोन, जुळवून घेण्याची क्षमता आणि कौशल्य ही एका यशस्वी लष्करी अधिकाऱ्याची त्रिसूत्री आहे. वेगाने बदलणाऱ्या युद्धपरिस्थितीत योग्य निर्णयक्षमता आणि परिस्थितीनुसार स्वतःला घडवण्याची तयारी अत्यावश्यक आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत त्यांनी भारताने चिथावणीला दिलेल्या ठोस आणि अचूक प्रत्युत्तराचा संदर्भ दिला आणि हा मानदंड भविष्यातील अधिकाऱ्यांनी जपण्याचे आवाहन केले.
युद्धभूमीवर लिंगभेदाला स्थान नसते. तेथे केवळ कौशल्य, चारित्र्य आणि नेतृत्व महत्त्वाचे ठरते. पुरुष आणि महिला अधिकारी यांनी खांद्याला खांदा लावून देशसेवा करणे हीच काळाची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले. ‘सेवा परमो धर्मः’ हे ब्रीदवाक्य प्रत्येक कठीण प्रसंगी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. छात्रांच्या यशामागील पालकांच्या योगदानाचाही गौरव करत, आजचा दिवस जितका छात्रांचा आहे तितकाच त्यांच्या पालकांचाही आहे. तुमचा त्याग त्यांच्या प्रत्येक पावलात दिसून येतो, अशा शब्दांत त्यांनी पालकांचे अभिनंदन केले.
सुखोई आणि चेतकची चित्तथरारक सलामी –
दीक्षांत संचलनाचा समारोप भारतीय हवाई दलाची मदार असलेल्या ‘सुखोई-३०’ या वेगाने हवेत झेपावणाऱ्या लढाऊ विमानांच्या चित्तथरारक मानवंदनेने झाला. ‘एनडीए’च्या सुदान ब्लॉकवरून भरारी घेणाऱ्या ‘सुखोई-३०’च्या थरकाप उडवणाऱ्या आवाजाने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. त्याआधी आकाशात आलेल्या चेतक हेलिकॉप्टरने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.