
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024) चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि.13) देशातील 10 राज्यांमधील 96 मतदारसंघात मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, पुणे, शिरुर, शिर्डी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या 11 मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरशीच्या लढती होत आहे.
दरम्यान, याआधी पहिल्या तीन टप्प्यांत झालेल्या मतदानास मतदारांचा कमी प्रमाणात प्रतिसाद दिसून आला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह 4 विरोधकही चिंतेत आहेत. यामुळे निदान चौथ्या टप्प्यात तरी जास्त प्रमाणात मतदान होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पंकजा, कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राज्यात रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, चंद्रकांत खैरे, अमोल कोल्हे, हिना गावीत, रक्षा खडसे हे दिग्गज मैदानात आहेत. महायुतीसाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी या मतदारसंघात सभांचा धडाका लावला. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी धुरा सांभाळली.
पुण्यात मोहोळ, धंगेकर आणि वसंत मोरेंमध्ये प्रमुख लढत
पुणे मतदारसंघात भाजपाचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत आहे. शिरूर येथे दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने असून अजित पवार गटाकडून शिवाजीराव पाटील आणि शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे रिंगणात आहेत.