
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडले. या मतदानाची आकडेवारी आता समोर आली असून, देशात 57.51 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगालमध्ये झाल्याची माहिती देण्यात आली.
पाचव्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 73 टक्के मतदान झाले. तर लडाख 67.15 टक्के, झारखंड 63 टक्के आणि ओडिशा 60.72 टक्के मतदान झाले. इतर राज्यांमध्ये या आकडेवारीत कमी-जास्त दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात 57.79 टक्के, जम्मू आणि काश्मीर 54.67 टक्के, बिहार 52.60 टक्के आणि महाराष्ट्र 49.01 टक्के अशी ही आकडेवारी आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये होते. ज्यामध्ये बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश होता.
राज्यात मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सोमवारी पार पडली. पाचव्या टप्प्यातील प्रचारात मुंबईत महाविकास आघाडीकडून प्रामुख्याने उद्धव ठाकरेंनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. लोकसभेच्या 49 जागांपैकी 14 उत्तर प्रदेशातील, 13 महाराष्ट्र, 7 पश्चिम बंगाल, 5 बिहार, 3 झारखंड, 5 ओडिशा आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एक जागा होती.