
पंतप्रधान मोदींच्या 'त्या' आवाहनाचा राज ठाकरेंकडून खरपूस समाचार; म्हणाले, 'मग शेकडो गाड्यांचा ताफा...'
मुंबई : इराण-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर निर्माण झालेले इंधन संकट आणि वाढत्या महागाईवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना एक मोठे आवाहन केले आहे. देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी आपण पेट्रोल-डिझेलचा वापर संयमाने केला पाहिजे आणि ‘वर्क फ्रॉम होम’सारख्या पर्यायांना पुन्हा प्राधान्य दिले पाहिजे, असे विधान पंतप्रधानांनी केले होते. या आवाहनाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत टीका केली. त्यात त्यांनी म्हटले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्क-फ्रॉम-होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणवर खर्च होते. आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत.
बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत. स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण? आमच्याकडून चूक झाली. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही, असं सांगणार आहात का? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का?
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ
सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल असा आहे. हा भाव जगाने या आधी कधी पाहिला नाही असं नाही. २००८ ला पुढे २०११-२०१२ मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळेस, २०१३-२०१४ च्या काळात (जेव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किंमती आणि देशाची इभ्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ), पुढे अशीच परिस्थिती २०२२ आणि २०२३ च्या दरम्यान जेंव्हा ओपेकने खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा देखील बॅरलचा भाव ९० ते १०० डॉलर्सच्या दरम्यान गेला होता. या घटनांपैकी ३ ते ४ वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते.
…त्या पैशांचं झालं काय?
मनमोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की, तेव्हा मोदींनी केलं नाही. मग आत्ताच का? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्या-राज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलं आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. बरं जेव्हा बॅरलचा भाव ६० ते ६५ डॉलर्सच्या आसपास होता तेव्हा पण तुम्ही चढ्या भावाने आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात, त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले जे काही लाख कोटी रुपये असतील ते कुठे गेले ? त्याचं काय झालं?