
जम्मू : महाराष्ट्र सरकारने जम्मू काश्मीर इथं ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्याला मंजुरी दिली आहे. काश्मिरात महाराष्ट्र भवन बांधणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. श्रीनगरच्या बडगाम येथे अडीच एकरावर हे भवन बांधण्यात येणार आहे. मात्र, महाराष्ट्र भवनाच्या निर्णयाला राज्याचे माजी मुख्यमंत्री, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी विरोध केला.
लोकसभा निवडणूक प्रचारात अब्दुल्ला यांनी येत्या ऑक्टोबर महिन्यात आमचे सरकार राज्यात आल्यानंतर हे भवन बंद करू, असे वादग्रस्त विधान केले. महाराष्ट्र भवनामुळे स्थानिक हॉटेल व्यावसायिकांचा रोजगार हिरावला जाईल, असे ते म्हणाले.
रेल्वे विभागाने काश्मिरातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. उत्तर रेल्वेने बुधवारी काश्मीर खोऱ्यातील रेल्वेभाडे कमी करण्याचा निर्णय घेतला. रेल्वे विभागाने राज्यातील रेल्वेभाडे 40 ते 50 टक्क्यांनी कमी केले आहेत. सवलतीपूर्वी, सदुरा स्टेशन (अनंतनाग जिल्हा) ते श्रीनगरचे भाडे 35 रुपये होते, ते आता 15 रुपयांपर्यंत खाली आले आहे. हा तिकीट दरातील दिलासा संपूर्ण काश्मीर खोऱ्यात लागू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, खोऱ्याच्या उत्तरेकडील बारामुल्ला शहरापासून, ते जम्मू विभागातील रामबन जिल्ह्यातील सांगलदानपर्यंत रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस उधमपूर ते बारामुल्ला अशी रेल्वे सेवा सुरू होईल.