
मुंबई : भाडेकरूंना बेघर करणाऱ्या केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात जोरदार आंदोलन केल्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. केंद्र सरकारचा भाडेकरू कायदा भाडेकरूंवर अन्याय करणारा असून यामुळे २५ लाखांहून अधिक लोकांना बेघर व्हावे लागू शकते. तेव्हा केंद्राचा हा भाडेकरू कायदा राज्यात लागू करू नका, अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिले.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात भाडे नियंत्रण कायदा हा राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. मुंबईसह राज्यातील अन्य शहरांत केवळ घरे रिकामी आहेत म्हणून नवीन भाडे नियंत्रण कायदा आणावा या मुद्द्याला अर्थ नाही.
मुंबईकरिता नवीन भाडे नियंत्रण कायद्याची गरज नाही. याकरिता मुंबई रेंट ॲक्ट व महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा सक्षम व परिपूर्ण असून नवी कायदा महाराष्ट्रात लागू करू नये अशी मागणी करण्यात आली. यावेळी परिवहनमंत्री ॲड. अनिल परब, शिवसेना उपनेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, आमदार सुनील प्रभू, सदा सरवणकर, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, पांडुरंग सकपाळ यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
केंद्र सरकारचा नवीन भाडेकरू कायदा महाराष्ट्रात लागू करू नये, यासाठी शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. pic.twitter.com/ihzyP2T3gJ — ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 9, 2021