
Anemia in pregnancy
सन २०२५ च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, देशातील १५ ते १९ वर्षे वयोगटातील ६३ टक्के मुलींमध्ये रक्तक्षय आढळून आला आहे. तर १९ ते ४९ वर्षे वयोगटातील ५३ टक्के महिलांमध्ये रक्तक्षयाचे निदान झाले आहे. गर्भवती महिलांपैकी निम्म्याहून अधिक महिलांना रक्तक्षय असल्याचेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
गर्भारपणात आईच्या शरीरात बाळाच्या वाढीसाठी अतिरिक्त रक्तनिर्मितीची प्रक्रिया सुरू असते. मात्र, शरीरात लोहाची कमतरता असल्यास हिमोग्लोबिनची पातळी घसरते. परिणामी अशक्तपणा, थकवा, त्वचा निस्तेज होणे, चिडचिड आणि शारीरिक कमजोरी अशी लक्षणे दिसू लागतात. योग्य वेळी उपचार आणि पोषण न मिळाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, गर्भारपणातील रक्तक्षयामुळे कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, अकाली प्रसूती, बाळाच्या शारीरिक व मानसिक विकासात अडथळे, कमी प्रतिकारशक्ती आणि नवजात बालकांमध्येही रक्तक्षयाचा धोका वाढतो. केंद्र आणि राज्य शासनाकडून ‘ॲनिमियामुक्त भारत’, ‘जननी सुरक्षा अभियान’, ‘प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान’ यांसारख्या योजना राबविल्या जात असल्या, तरी रक्तक्षयाचे प्रमाण अपेक्षितरीत्या कमी होत नसल्याचे चित्र आहे.
राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, ‘ॲनिमियामुक्त भारत’ मोहिमेंतर्गत मार्च २०२६ अखेर महाराष्ट्रात २३ लाख ५० हजार ३०८ गर्भवती महिलांमध्ये प्रसूतिपूर्व रक्तक्षयाचे निदान झाले. त्यापैकी १२ लाख ०३ हजार ३६९ महिलांना प्रसूतिपश्चात उपचारात्मक औषधे देण्यात आली, तर तीव्र रक्तक्षय असलेल्या ७६ हजार ८१ गर्भवती महिलांना लोहयुक्त इंजेक्शन देण्यात आले.
दरम्यान, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात रक्तक्षयाचे प्रमाण अधिक दिसत असले, तरी ग्रामीण भागात तपासण्यांचे प्रमाण कमी असल्याने प्रत्यक्ष स्थिती अधिक गंभीर असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. पुणे शहर स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेने नुकत्याच आयोजित केलेल्या रक्तक्षय तपासणी शिबिरात तपासलेल्या ८०० महिलांपैकी तब्बल ६५ टक्के महिलांमध्ये तीव्र रक्तक्षय आढळून आला.
स्त्रीरोगतज्ञ डॉ. शुभदा पाटील सांगतात, ‘राज्य शासन विविध मोहिमा राबवत असले, तरी महिलांमध्ये रक्तक्षयाविषयी अपेक्षित जनजागृती झालेली नाही. अनेकदा औषधे वेळेवर घेतली जात नाहीत, त्यामुळे समस्या वाढत जाते. किशोरवयातच मुलींमध्ये रक्तक्षय आढळतो आणि त्याच अवस्थेत त्या गर्भधारणेच्या टप्प्यावर पोहोचतात. त्यामुळे रक्तक्षय रोखण्यासाठी किशोरवयापासूनच विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.’