
कोकणात राखणदार हा फार मोठा विषय आहे कारण राखणदार ही अदृश्य शक्ती जरी असली तरी वाईट नाही. ती फक्त लोकांना वाईट करण्यापासून आणि वाईट होण्यापासून दूर ठेवते, जोपर्यंत आपण त्याचे ऐकू तोपर्यंत आपले वाईट होणार नाही आणि त्याच्या शब्दांच्या पलीकडे गेलात तर पुढे काही होईल हे फक्त राखणदारालाच ठाऊक! अशीच काही उदाहरणे सांगणारे घटना कोकणात नेहमी घडत असतात. त्यापैकी एक पुढीलप्रमाणे :
करण मुंबईत राहणारा आणि इथेच वाढलेला तरुण! आईवडिलांच्या निधनानंतर गावात असणारा रान तोडून तिथे काही तरी नवीन प्रकल्प उभारणाच्या शोधात रत्नागिरीकडे रवाना झाला. गावी तसे त्याचे कुणी राहत नाही. गावाबाहेरून काही 10 ते 15 मजूर पकडले आणि रान तोडण्यासाठी रानात जमले. करणने आधी गावातल्याच काही तरुणांना पैसे देऊन रान तोडण्यासाठी मदत करावी अशी विनंती केली पण ते रान तोडण्यासाठी कुणीही तयार नव्हते. याउलट त्यालाच ते रान तोडू नका असे सांगण्यात आले, पण करण कुणाचंच ऐकत नव्हता. शेवटी त्याने गावाशेजारील तरुण गोळा करून आणले.
करणने जशी मंडळी गोळा केली तसे गावातले अनेक गावकरी त्या ठिकाणी जमले आणि इतर जमलेल्या मजूर मंडळीला अडवू लागले. तेव्हा करण स्वतः त्या ठिकाणी येऊन पोहचला आणि त्याने सगळ्यांसमोर आणि सगळ्यांच्या विरोधात कुऱ्हाडीने पहिला घाव रानातील एका झाडावर घातला, जसा तो घाव पडला तसाच जंगलाच्या आतून कुणीतरी वृद्ध किंचाळण्याचा एकच आवाज सगळीकडे घुमला. सगळे गावकरी तेथून पळून गेले, पण करण आणि त्याच्या मजुरांनी तेथे झाडे तोडण्याची कामे सुरूच ठेवली.
त्या रात्री करण झोपेत असताना त्याला खोलीच्या बाहेरून कुणी तरी काठी टेकत असल्याचे भास येत होता. त्याच्या कानात घुंगरूंचे स्वर आणि दुपारची जंगलातून आलेली ती किंचाळी खिणखिणत होती. तो मुळीच झोपला नाही. पण दुसऱ्या दिवशी काही अजबच घडलं. रानात एकही मजूर आलेला नव्हता. त्यांना बोलावण्यासाठी करण शेजारच्या गावात गेला तेव्हा ते मजूर तिथे येण्यासाठी नकार देऊ लागले. करणने त्यांना जास्ती मजूर देणार असे वाचन दिले तरीही कुणीही येण्यास नव्हते. त्या सगळ्या मजुरांच्या अंगावर काठीचे वळ उठलेले होते जणू त्यांना कुणी बेदम मारलं आहे. त्यामुळे त्यांना येथे यायचेही नव्हते.
शेवटी, आपण रान तोडले नाही तर आपली सगळ्या गावकऱ्यांसमोर नाचक्की होईल असे करणला वाटले आणि तो एकटाच कुऱ्हाड घेऊन रानात पोहचला. त्याने कुऱ्हाड जोरात एका झाडावर चालवली आणि अचानक वातावरण बदलले. पाऊस बरसू लागला आणि जंगलातून एक वृद्ध पण साडे 7 फुटी म्हातारा बाहेर आला आणि करणसमोर उभा राहिला. त्या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली. पण ‘राखणदारा’समोर कोण टिकणार? दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना करण त्याच रानात एका झाडाला टांगलेला सापडला. गावकऱ्यांना ठाऊकच होतं की हे होणार आहे आणि हे घडलंच! सुदैव म्हणजे करण निदान जिंवत होता.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर
हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)