फोटो सौजन्य - AI
यामागे दडलीये एक पौराणिक कथा! असे म्हणतात की सुमारे चारशे वर्षांपूर्वी मामा आणि भाच्याची जोडी, वास्तव्याच्या शोधात चिंदर गावात आली. त्या रानात भटकताना तेथे कुणी नसूनदेखील शेजारी हजारो जणांचा सहवास असल्याचे चित्र त्यांना जाणवत होते. रानावनात भटकत ते एका कुटीच्या अंगणात येऊन थांबले, त्या कुटीतून एक वाघ बाहेर आला. त्या वाघाने या दोघांवर अचानक हल्ला केला. तेव्हा त्या कुटीतून एक दिव्य बाई बाहेर आली. ती महिला दुसरी-तिसरी कुणी नसून, त्या चिंदर गावाची ग्रामदेवता आई पावणाई होती. हातात त्रिशूल असणाऱ्या या आदिमायेने त्या वाघाला शांत केलं. तेव्हा त्या दोन्ही भटक्यांनी आईला आपली व्यथा सांगितली आणि गावात वास्तव्य मागितलं. आई म्हणाली की,”या गावात एक रानडुक्कर (वाईट शक्तींनी भरलेला असुर) आहे. तो येथील शेतीचे नुकसान करतो. पाळीव प्राणी आणि त्याचा पालक, दोघांना गिळून टाकतो. तुम्हाला येथे राहायचे असेल तर त्या असुराचा नाश करावा लागेल.” तेव्हा ते दोघे रानात भटकून त्या रानडुक्कराचा शोध घेऊन त्याचा वध करतात. जसा तो असुर मारला जातो त्याच वेळी त्या गावाशेजारील हजारो आत्मा त्या दोघांच्या समोर येऊन उभे राहतात, त्याचवेळी तेथे आई पावणाईही प्रकट होते. त्या आत्म्याचे म्हणणे असते की या गावावर त्यांचे राज्य आहे आणि त्यांनाच या गावात राहायचे आहे. त्याचवेळी गावातील माणसंही तेथे उपस्थित असतात. ग्रामदेवतेला आपण नक्की काय करावे? भूत की माणसं? यामुळे गोंधळ होतो आणि मध्यस्थीसाठी रवळनाथाला बोलावले जाते. रवळनाथ तर्क लावून सांगतो की या गावात ३ वर्ष माणसं राहतील. पण त्या ३ वर्षांनी त्यांना हे गाव पुढील ३ दिवसांसाठी मोकळे करावे लागेल आणि त्या ३ दिवसांसाठी या गावात पूर्णपणे भूत प्रेत आणि आत्म्याचे राज्य राहील. पण ३ दिवस संपताच पुन्हा हे गाव माणसांसाठी खुले होईल आणि भूत प्रेतांना हे गाव सोडावे लागेल. प्रत्येक ३ वर्षांनी हे चक्र सुरु राहील.
आज चिंदर गावातील पावणाई देवी मंदिरात त्या मामा भाच्याचेही पाषाण आहे. तर त्या गावात आजही दर तीन वर्षांनी तीन दिवसांसाठी ते गाव रिकामे केले जाते आणि या ३ दिवसांत या गावात जाणे बंदी असते.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)






