
हवामानबदलामुळे वाढला कुपोषणाचा धोका! मातेच्या पोषणाला प्राधान्य देणे गरजेचे; बालकांचे पोषणही घटले
हवामान बदल हा कुपोषणाच्या वाढत्या समस्येमागील एक महत्त्वाचा घटक ठरत असून, त्याचा थेट परिणाम गर्भवती महिला आणि बालकांच्या आरोग्यावर होत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. युनिसेफ इंडिया आणि पत्र सूचना कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मातृ पोषण, प्रारंभिक बाल्यावस्था विकास आणि हवामान बदल यांतील परस्परसंबंध अधोरेखित करण्यात आला.(फोटो सौजन्य – istock)
महाराष्ट्रात दुष्काळ, उष्णतेच्या लाटा आणि कृषी संकटांमुळे विशेषतः आदिवासी भागांतील गर्भवती महिला, शहरी झोपडपट्ट्यांतील कुटुंबे आणि कृषीप्रधान जिल्ह्यांतील महिलांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. अन्नधान्याच्या वाढत्या किमतीमुळे आहारातील वैविध्य कमी होत असून, यामुळे पोषणातील तूट अधिक गंभीर बनत आहे. तज्ज्ञाच्या मते, गर्भधारणेच्या प्रारंभिक टप्प्यातील पोषण हे बाळाच्या मेंदूच्या आणि शारीरिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. या काळात पोषणाचा अभाव राहिल्यास भविष्यात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. तसेच लड्नुपणा, इन्सुलिन प्रतिकार आणि मानसिक आजारांची शक्यताही बळावते.
‘गर्भवती महिलेला आहार असुरक्षितता, मानसिक ताण किवा शारीरिक थकवा सहन करावा लागल्यास तिच्या बाळाच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो,’ असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. गर्भधारणेपूर्वीपासून ते जन्मानंतरच्या पहिल्या १,००० दिवसांपर्यंतचा काळ हा बालकाच्या आरोग्याचा पाया घालणारा असल्याचेही त्यांनी नमूद केले, माता आणि बाल पोषणाची योग्य काळजी घेणे हे हवामान बदलाशी सामना करण्यासाठी प्रभावी धोरण ठरू शकते. यामुळे कुपोषणाचे दुष्टचक्र थांबवता येऊन भविष्यातील आरोग्य खर्च कमी करण्यास मदत होईल.